नेमकी घटना काय?
रामदास भरत पवार (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामदास हे येवलेवाडी परिसरातील एका सलूनमध्ये कारागीर म्हणून कामाला होते. सलूनची मालकीण शीतल काळे हिच्यासोबत त्यांचा काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रृती कन्हेरे, ऋषी कन्हेरे आणि मोहन सोनार या सात जणांनी मिळून रामदास यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
advertisement
आरोपींनी रामदास यांना "आम्ही तुझी पोलिसात तक्रार करू" अशी धमकी दिली होती. ही तक्रार टाळण्यासाठी त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या सततच्या मानसिक छळाला आणि धमकीला कंटाळून रामदास यांनी ३० डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी रामदास यांनी आपल्या वहीत आणि सोशल मीडियावर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी आरोपींच्या त्रासामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच त्यांनी आपल्या बहिणीलाही या छळाबाबत कल्पना दिली होती. याप्रकरणी रामदास यांची बहीण रूपाली संतोष पुजारी यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
