पुणे : देशात 1990 च्या दशकात अयोध्येत रामजन्मभूमी आंदोलन सुरु होते. दोन शतकांहून अधिक काळ हे आंदोलन चालले. यात अनेक घटना आणि घडामोडी झाल्या. शेवटी 6 डिसेंबर 1992 रोजी देशभरातील कारसेवकांनी एकत्र येत बाबरी मशिदीचा ढाचा पाडला. या घटनेला आता 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच या जागेवर आता राम मंदिराची उभारणीही झाली आहे. या सर्व घटना घडामोडींमध्ये पुण्यातील पर्वती परिसरात राहणारे मैथिली अष्टेकर आणि शेखर घोडके हे कारसेवक देखील सहभागी झाले होते. बाबरी मशीद पाडतानाचा थरारक अनुभव त्यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितला आहे.
advertisement
निरागस भावाचं प्रहारात रुपांतर
“लहानपणा पासून मनात राम, सीता, हनुमान हे सगळे भाव तयार झाले होते. त्यामुळे झालेला अन्याय पाहावत नव्हता. राम मंदिर होतं त्यावरच ढाच्या उभारला होता. का हा अन्याय सहन करायचा? असे सगळे प्रश्न मनात होते. आम्ही जे पाहिलं ते सगळं कल्पनेच्या बाहेर होतं. प्रचंड जनसमुदाय हा तिथे जमला होता. सगळेजण आवेश मनामध्ये आणून त्या ढाच्याला पाडू इच्छित होते. आमचे श्रीराम तिथे आहेत, मात्र आम्हाला ते दिसत नाहीत. प्रत्येकाच्या मनातला भाव हा निरागस होता. या निरागस भावाचे रूपांतर प्रहारामध्ये झालं तर काय घडू शकतं? हे आम्ही पाहिलं,” अशी माहिती मैथिली अष्टेकर यांनी दिली आहे.
योगदान सार्थकी लागलं
“मी कारसेवेला गेलो तेव्हा माझं वय हे 22 वर्ष होतं. मी माझ्या आई सोबत ही कारसेवा पूर्ण केली. तिकडे सगळी भाषणं सुरु होती त्यामुळे आम्ही पेटलो होतो. हा ढाच्या पडायचाच असा निर्धार सर्वांचा होता. शेवटचे दीड तास होते. चार लोक आम्ही आत मध्ये होतो. ‘जय श्रीराम’चा नारा देत ऊर्जा निर्माण करत आम्ही ती मशीद पडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्हाला बाहेर जायला सांगितलं. तेव्हा मोठ मोठे दगड पडत होते. तेव्हा मी मरता मरता वाचलो. आता त्या ठिकाणी राम मंदिर उभं राहिलं आहे. त्यामुळे आमचं हे योगदान सार्थकी लागलं असं वाटतं,” अशी माहिती कारसेवक शेखर घोडके यांनी दिली.
दरम्यान, रामजन्मभूमी वाद खटला दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात गेला. अखेर, 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच खंडपिठाच्या न्यायालयाने हिंदुंच्या बाजूने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आणि याच जागेवर सध्या श्रीराम मंदिर उभ आहे. त्यामुळे आपल्याला आनंद असल्याचे कारसेवक सांगतात.





