सध्या या रिंगरोडच्या कामातील सुमारे 13 टक्के काम पूर्ण झाले असून, भूसंपादनाची प्रक्रिया जवळजवळ संपली आहे. रिंगरोडचे एकूण अंतर 136 किलोमीटर असून त्याची रुंदी सुमारे 110 मीटर असेल. हा रिंगरोड पूर्व व पश्चिम अशा दोन टप्प्यांत बांधला जाणार असून, 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पुणेकर सावधान! दिवाळीला गोडधोड खाताय की विष? तब्बल 1 कोटी 97 लाखांची मिठाई जप्त
advertisement
या महामार्गावर टोलनाके, बोगदे आणि पथदिवे यांसाठी आवश्यक असलेली वीज सौरऊर्जेमधून पुरवली जाणार आहे. त्यामुळे पारंपरिक विजेवरील खर्चात मोठी बचत होईल. समृद्धी महामार्गावर याच धर्तीवर दोन सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले होते. एक 5 मेगावॉट आणि दुसरा 4 मेगावॉट क्षमतेचा आहे. त्यामधून दरमहा लाखो रुपयांची वीजबिल बचत झाली आहे. त्याच अनुभवावर आधारित हा रिंगरोड प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविला जात आहे.
रिंगरोड ग्रीन कॉरिडॉर म्हणून ओळखला जावा यासाठी केवळ सौरऊर्जाच नव्हे, तर पर्यावरणपूरक अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. महामंडळाने यासाठी सल्लागार नेमण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या मार्गावर आठ हजारांहून अधिक झाडांची तोड करावी लागणार आहे, परंतु त्याचबरोबर जवळपास साडेतीन हजार झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. तसेच रिंगरोडच्या कडेला पाच लाखांहून अधिक नवीन वृक्षांची लागवड करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
या उपक्रमातून निर्माण होणारी जादा सौरऊर्जा शेजारील गावांना देण्याचाही एमएसआरडीसीचा विचार आहे. यामुळे स्थानिक वीजपुरवठा व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि ग्रामीण भागात नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढेल.
अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले की, रिंगरोड ग्रीन कॉरिडॉर म्हणून ओळखला जावा, यासाठी सौरऊर्जेचा वापर, वृक्षांचे पुनर्रोपण आणि मोठ्या प्रमाणात नव्या झाडांची लागवड या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पर्यावरणपूरक विकासाचे उत्कृष्ट उदाहरण ठरेल.
हा रिंगरोड प्रकल्प केवळ वाहतूक सुलभता वाढविणारा नाही, तर ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि हरित विकास यांचा संगम ठरणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. तसेच सौरऊर्जेमुळे वीज वापरावर नियंत्रण येईल.
एकूणच, पुण्याचा बाह्य रिंगरोड प्रकल्प राज्यातील पहिला ग्रीन कॉरिडॉर बनून पर्यावरणपूरक पायाभूत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती, वृक्षलागवड आणि पुनर्रोपण या सर्व उपक्रमांमुळे हा रिंगरोड महाराष्ट्रातील इतर महामार्गांसाठी आदर्श ठरण्याची शक्यता आहे.