महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरातील रस्त्यांवर मे महिन्यापासून आतापर्यंत एकूण 3,615 खड्डे पडले. त्यापैकी डांबर आणि कोल्ड मिक्सने 1,449, बीबीएमने 247, खडी टाकून 981, पेव्हिंग ब्लॉकने 272, तर सिमेंट काँक्रिटने 432 खड्डे बुजविले गेल्याचा दावा आहे. एकूण 3,381 खड्ड्यांचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते, जे प्रमाणाच्या दृष्टीने 80.21 टक्के आहे. यामुळे केवळ 392 खड्डे बाकी असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.
advertisement
मात्र, नागरिकांच्या दैनंदिन अनुभवातून वेगळेच वास्तव समोर येते. शहरातील प्रमुख रस्त्यांपासून उपनगरातील गल्लीबोळापर्यंत खड्ड्यांचे साम्राज्यच असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून मोजमाप केले तरी महापालिकेच्या आकडेवारीशी ताळमेळ बसत नाही. त्यामुळे हा दावा फक्त कागदोपत्री राहिल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. मोठमोठ्या खड्ड्यांना चुकवताना गाड्या संथगतीने चालवाव्या लागतात, परिणामी वाहतूक कोंडी होते. शिवाय, खड्ड्यांतून सुटणारी सैल खडी आणि खचलेली माती यामुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात घडत आहेत. लहान मुलांसह कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविले जातील, असा महापालिकेचा गाजावाजा केला होता. मात्र, प्रत्यक्षात सणाच्या उंबरठ्यावरही रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती पूर्ववत असल्याने नागरिकांची नाराजी वाढली आहे. सोशल मीडियावरून नागरिकांनी महापालिकेला लक्ष्य केले असून, आकडेवारी ऐवजी प्रत्यक्ष कृती हवी अशी मागणी होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न डोकेदुखी ठरतो, निधी खर्च होतो, दावे केले जातात, तरीही स्थिती पूर्वपदावर येत नाही. यंदाही त्याला अपवाद राहिला नाही. आगामी काळात महापालिका खरोखरच उरलेले खड्डे बुजवते की पुन्हा हा प्रश्न पुढील वर्षी समोर येतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.