पुणे : “धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव। तेथे नांदे देव पांडुरंग। धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे। उच्चारिती वाचे नामघोष।।” असा देहूगावासंदर्भात गौरवपूर्ण उल्लेख स्वतः तुकोबारायांनी केलेला आहे. या उल्लेखाची आठवण आषाढ महिना जवळ आला की, हमखास होते. कारण वर्षभर वारकरी आषाढी वारीची आतुरतेनं वाट पाहत असतात. ठरलेल्या वेळेप्रमाणं देहूगावात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं वारकरी दाखल होतात. अनेक महिने तयारी करून जल्लोषात, अत्यंत प्रसन्न वातावरणात, मोठ्या भक्तीभावानं जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं या देहूगावातून पंढरपूरला विठ्ठलभेटीसाठी प्रस्थान होतं.
advertisement
यंदा 29 जून रोजी संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्याला सुरूवात होतेय. त्यानिमित्तानं संपूर्ण देहू गाव विठू नामाच्या जयघोषात आकंठ न्हाऊन निघालंय, इथल्या विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी सुंदर फुलांची सजावट करण्यात आलीये. तर, महाराजांच्या पालखीवर धरायला थेट चेन्नईहून खास कारागिरांनी हातानं विणलेली वेलवेटची छत्री आणलीये.
हेही वाचा : Wari 2024: पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग अलर्टवर! कशी आहे व्यवस्था?
देहूत आज खऱ्या अर्थानं वैष्णवांचा मेळा भरलाय, असं म्हणायला हरकत नाही. नियोजित वेळेनुसार महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होईल. त्यामुळे सर्व वारकरी, भाविक, सर्वसामान्य नागरिक न भूतो न भविष्यति असा हा सोहळा आपल्या डोळ्यांत सामावून घेताहेत. 'ग्यानबा तुकोबाचा' जयघोष करत प्रत्येक वारकरी एक एक पाऊल पुढे टाकतोय. एकीकडं विठ्ठल भक्तीनं त्यांच्या मनातला सर्व शीण, थकवा दूर झालाय, तर दुसरीकडं फुलांच्या सजावटीतून येणाऱ्या मनमोहक सुगंधानं मन प्रसन्न होतंय.
दरम्यान, दरवर्षी वारकरी पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करत असतात. या प्रवासात त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. पोलिसानांचाही चोख बंदोबस्त आहे. देहू आणि परिसरात अत्यंत चैतन्यमय वातावरण पाहायला मिळतंय. शिवाय वरुणराजानं हजेरी लावल्यामुळे मातीच्या सुगंधात वारकरी बांधव खरोखर भक्तीरसात न्हाऊन निघाले आहेत. तुकोबांच्या पालखीचं दुपारी 4 वाजताच्या सुमारास प्रस्थान होईल असं नियोजित आहे.