महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने वसई आणि भाईंदरदरम्यान ‘रो-रो’ फेरी बोटीची सेवा सुरू करण्यात आली आहे. या फेरी बोटीची क्षमता एकावेळी सुमारे 33 वाहने आणि 100 प्रवासी इतकी आहे. कमी वेळेत आणि तुलनेने सोयीस्कर प्रवास करता येत असल्यामुळे दिवसेंदिवस अनेक नागरिक या सेवेचा पर्याय स्वीकारत आहेत.
Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी संकट, सूर्य आग ओकणार, अवकाळी झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट
advertisement
दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलावर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत महामार्गावर वाहनांची लांबलचक रांग लागते. त्यामुळे वसई ते मिरा-भाईंदर हा प्रवास अनेकदा अत्यंत कष्टदायक ठरत आहे. अनेकांना वाहतूक कोंडीत अडकून वेळेत कार्यालयात किंवा घरी पोहोचणेही कठीण होत आहे.
याचबरोबर उपनगरी लोकल गाड्यांमधील वाढती गर्दीही प्रवाशांसाठी मोठे आव्हान बनली आहे. वसई ते भाईंदरदरम्यान प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना ठरलेल्या लोकलमध्ये चढणे कठीण जात असल्याने त्यांनी रो-रो फेरी सेवेचा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवासी अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या उशिरामुळे फेरी बोट चुकवत होते. परिणामी पुढील फेरीसाठी त्यांना तब्बल 1.5 ते 2 तास प्रतीक्षा करावी लागत होती. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन सायंकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्यांच्या वेळेत 15 मिनिटांची वाढ करण्यात आली आहे.
नव्या वेळापत्रकानुसार, भाईंदरहून सायंकाळी 6:45 वाजता सुटणारी बोट आता 7:00 वाजता सुटणार आहे. तसेच 7:30 वाजता सुटणारी फेरी बोट आता 7:45 वाजता सुटेल. या तात्पुरत्या बदलामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी माहिती वसई–भाईंदर रो-रो सेवेचे व्यवस्थापक अरबाज शेख यांनी दिली.






