राक्षसी कट! मुख्याध्यापकाची होत नव्हती बदली म्हणून 11 विद्यार्थ्यांना पाजलं विष; वाचा सविस्तर...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सुलेमान घोरी नायक यांच्या बदलीसाठी सागर पाटीलने विकृत कट रचला. त्याने...
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी येथील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाची बदली व्हावी, यासाठी शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. या विषबाधेमुळे शाळेतील 11 मुलांना त्रास झाला होता.
या प्रकरणी सागर सक्रेप्पा पाटील (वय-29), नागनगौडा बसप्पा पाटील (वय-25) आणि कृष्णा यमनप्पा मादर (वय-26, तिघेही रा. हुलीकट्टी) या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बेळगावचे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
कसा रचला हा कट?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण पंधरा दिवसांपूर्वी हुलीकट्टी येथील जनता सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील 11 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. या शाळेत एकूण 41 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 11 विद्यार्थ्यांना अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, उपचारानंतर सर्व मुलांना घरी सोडण्यात आले. बेळगाव पोलिसांनी या विषबाधेचा सखोल तपास सुरू केला होता.
advertisement
तपासात धक्कादायक माहिती समोर आली. हुलीकट्टी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुलेमान घोरी नायक हे गेली 14 वर्षांपासून या शाळेत कार्यरत आहेत. सध्या ते मुख्याध्यापक पदावर आहेत. एका संघटनेचा तालुकाध्यक्ष असलेला सागर पाटील याला हे मुख्याध्यापक आपल्या गावात नको होते. त्यांची बदली कशी करता येईल, याचा तो विचार करत होता. शाळेतील विद्यार्थी काही कारणामुळे मृत झाले, तर त्याचा ठपका मुख्याध्यापकांवर येईल आणि त्यांची बदली करणे शक्य होईल, असा विकृत विचार करून सागर पाटीलने हा कट रचला होता.
advertisement
आमिष दाखवून विद्यार्थ्याकडूनच विष मिसळले!
पाण्याच्या टाकीत विष मिसळण्याच्या दिवशी, नागनगौडा आणि कृष्णा या दोघांनी मुनवळ्ळीला जाऊन एका खतविक्रीच्या दुकानातून कीटकनाशक आणले. त्यानंतर, शाळेतीलच एका निष्पाप मुलाला चॉकलेट आणि 500 रुपयांच्या नोटेचे आमिष दाखवून त्याला ते कीटकनाशकाची बाटली शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत ओतण्यास सांगितले. त्या मुलानेही त्यांच्या सांगण्यानुसार ती बाटली टाकीत ओतली.
advertisement
टाकीतील पाणी विद्यार्थ्यांनी प्यायल्यानंतर त्यांच्या पोटात दुखणे, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेची सखोल चौकशी करत असताना पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. या घटनेमुळे हुलीकट्टी गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे ही वाचा : नाशिक हादरलं: ट्यूशनमध्ये रचला खूनी खेळ, दहावीच्या विद्यार्थ्याची क्लासमेटकडून निर्घृण हत्या
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 7:56 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
राक्षसी कट! मुख्याध्यापकाची होत नव्हती बदली म्हणून 11 विद्यार्थ्यांना पाजलं विष; वाचा सविस्तर...


