आपण डिप्रेशनचे शिकार तर नाहीत ना? पाहा काय आहेत नैराश्याची लक्षणे? Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Mayuri Sarjerao
Last Updated:
'डिप्रेशन' या समस्येला समजून कसं घ्यायचं? आणि एखादा व्यक्ती या समस्येतून जात असेल तर हे कशा पद्धतीनं हाताळायचं? याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ला यांनी माहिती दिलीय.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई: सध्याच्या काळात आपण 'डिप्रेशन' हा शब्द अनेकदा ऐकतो. भारतासारख्या देशात नैराश्य किंवा डिप्रेशन ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये डिप्रेशनबाबत वारंवार बोललं जातं. एका अहवालानुसार 13 ते 15 वयोगटातील मुलं-मुलीही हा शब्द वापरताना दिसतात. जगभर पसरलेल्या तरुणाईमधील ’डिप्रेशन’ या समस्येला समजून कसं घ्यायचं? आणि जर खरचं एखादा व्यक्ती या समस्येतून जात असेल तर हे कशा पद्धतीनं हाताळायचं? याबाबत पुण्यातील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ला यांनी माहिती दिलीय.
advertisement
डिप्रेशन म्हणजे काय?
तणाव हे काही मानसिक आजारांचं कारण आहे. पण सगळेच मानसिक आजार हे तणावामुळे होत नाहीत. ते मेंदुच्या रचनेमुळे, शारीरिक आजारांमुळे किंवा खूपच गंभीर समस्येमुळे होऊ शकतात. कधीतरी उदास वाटणे, राग, चिडचिड होणे आणि किंवा एक-दोन दिवस एकटेपण जाणवणे यात आणि डिप्रेशनमध्ये फरक आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणीच्यावेळी किंवा एखाद्या परिस्थितीत वाईट वाटणे म्हणजे डिप्रेशन नाही. एखादा व्यक्ती काही आठवडे सलग त्याच मूडमधून जात असेल किंवा सतत विचार करत असेल तर ती कदाचित नैराश्य येण्याची लक्षणे असू शकतात. त्यामुळे थोड्या-थोड्या गोष्टींसाठी वाईट वाटणं किंवा चिंता वाटणं म्हणजे लगेच डिप्रेशन होत नाही. हे लक्षात घ्यायला हवं, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
डिप्रेशनची लक्षणे
डिप्रेशनमध्ये रडणे, थकवा, निराशा, झोप न येणे, भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे यासारखे शारीरिक आणि मानसिक अनुभव येऊ शकतात. तसेच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीची ही मानसिक स्थिती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली. म्हणजेच जर दोन ते तीन आठवडे सलग दिसून येत असेल तर ही लक्षणे डिप्रेशनच्या जवळ जाणारी नक्कीच असू शकतात. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, असे डॉक्टर सांगतात.
advertisement
तज्ज्ञांना सल्ला गरजेचा
नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञांची भेट आवश्यक असते. त्या व्यक्तीची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक थेरपी आणि औषधे ते सुचवू शकतात. मानसिक समस्या हा देखील एक प्रकारचा आजार आहे. ज्याचा उपचार करण्यासाठी एखाद्या तज्ज्ञाचीच गरज असते आणि हा आजार तज्ज्ञांशी बोलूनच कमी होऊ शकतो. त्यावर उपचार केले तर ती व्यक्ती या समस्येतून लवकर बाहेर पडू शकते. त्यामुळे या आजाराबाबत मोकळेपणानं बोलणं तितकच महत्त्वाचं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 01, 2024 5:31 PM IST