होय, भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे...! पक्षातीलच नेत्याचा कबुलीनामा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sudhakar Badgujar: मोठे शक्तिप्रदर्शन करीत नाशिकहून मुंबईच्या दिशेने सुधाकर बडगुजर भाजप प्रवेशासाठी निघाले आहेत. त्यांचा भाजप प्रवेशावरून टीका होत असताना भाजप म्हणजे वॉशिंग मशीन असल्याची कबुली पक्षाच्याच नेत्याने दिली आहे.
नाशिक : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याने सुधाकर बडगुजर यांना देशद्रोही ठरवून त्यांना अटकेची मागणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षातच आता बडगुजर यांचा प्रवेश होणार आहे. मोठे शक्तिप्रदर्शन करीत नाशिकहून मुंबईच्या दिशेने बडगुजर निघाले आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पक्षातही दोन गट पडले आहेत. बडगुजर यांना भाजप प्रवेश द्यावा, असे एका गटाचे म्हणणे आहे तर त्यांना भाजपमध्ये अजिबात घेऊ नये, असे काही नेत्यांना वाटते.
बडगुजर यांना भाजप प्रवेश दिला तर ज्यांच्यावर आरोप केले, त्यांचाच पक्षप्रवेश घडवून आणला जातो, किंबहुना त्याचसाठी आरोप केले जातात, या विरोधकांच्या आरोपाला बळ मिळेल, असे भाजपमधील काही नेत्यांना वाटते. मात्र दुसरीकडे बडगुजर भाजपप्रवेश करून पक्षाचे नियम पाळत असतील आणि विचारधारा अंगीकारत असतील तर आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे म्हणत त्यांच्या प्रवेशाचे स्वागतही केले जात आहे. भाजप नाशिक जिल्ह्याचे महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी तर बडगुजर यांचे स्वागत करताना भाजप हे वॉशिंग मशीन असल्याची कबुलीच दिली आहे.
advertisement
...तरच ते भाजपात येतील
सुनील केदार म्हणाले, इतर राजकीय पक्षांमधून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपाचे प्राथमिक सदस्य होण्यास काहीही अटी शर्ती नाही. त्याकरिता मो.नं. ८८००००२०२४ डायल करून ऑनलाईन पद्धतीने देशातील कोणालाही भाजपचे प्राथमिक सदस्य होता येते. तथापि भाजपची कार्यपद्धती पाहता जे जे पक्षात येतील, त्यांच्या कोणत्याही अटी शर्ती नसतील. त्यांना भाजपची कार्यपद्धती, ध्येय धोरणे अंगिकारावीच लागतील. तरच ते भाजपात येतील.
advertisement
वॉशिंग मशिनचा अर्थच असा आहे की...
इतिहास साक्षी आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. त्यानुसार वॉशिंग मशिनचा अर्थच असा आहे की त्यांनी मागचा इतिहास सोडून भाजपची कार्यपद्धती अंगिकारली पाहिजे. त्याप्रमाणे जर भाजप करत असेल तर काय हरकत आहे. शेवटी लोकशाही पद्धतीच्या राजकारणात डोक्याला जितके महत्त्व आहे तितकेच महत्व त्या पक्षात डोके किती संख्येने जास्त आहेत ते पण तितकेच महत्वाचे आहेत. तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार विश्वासदर्शक ठरावात एका मताने पडले होते. त्यानंतर पंतप्रधान पदाच्या पदावर संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला होता. त्यामुळे देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये कोणी येत असेल आणि पक्षाची रचना व कार्यपद्धती अंगिकारत असेल तर काय हरकत आहे, अशी विचारणा टीकाकारांना सुनील केदार यांनी केली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
June 17, 2025 3:12 PM IST