अवघ्या सहा महिन्यात कुंकू पुसलं, पोटातल्या जीवासाठी गाव सरसावलं, घेतला असा निर्णय, तुम्हीही कराल कौतुक!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Marriage: गावकऱ्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता समाजातील अनिष्ट प्रथांना छेद देणारी आणि नवा आदर्श निर्माण करणारी ठरली आहे.
नांदेड: एखाद्याच्या आयुष्यात भयंकर वादळ येते आणि सगळे संपल्याची स्थिती निर्माण होते. तेव्हा एखादा निर्णय पुन्हा नव्याने उभं राहण्याचं बळ देतो. अशीच घटना नांदेडच्या लोहा तालुक्यातील भारसवाडा येथे घडली. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी शीतलचा विवाह झाला, पण रस्ते अपघातात पती गमावला. तेव्हा पोटात असणाऱ्या बाळाचे छत्र हरवले जाऊ नये म्हणून गावकऱ्यांनी माणुसकीचा आदर्श निर्माण केला.
पती संतोष सुभाष धनुरे (वय 24) याच्या मृत्यूनंतर शीतलचा विवाह धाकटा दीर राजेश्वर याच्याशी लावून देण्यात आला. विशेष म्हणजे धार्मिक मान्यता आणि इतर बाबींना फाटा देत गावकऱ्यांनीच हा आदर्शवत निर्णय घेतला. त्यामुळे कोमेजलेल्या संसाराला पुन्हा नवी उभारी मिळाली आहे.
advertisement
नेमके घडले काय?
भारसवाडा येथील संतोष धनुरे यांचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वी शीतलसोबत विवाह झाला होता. 21 मार्च रोजी राहटी फाटा येथे अपघातात संतोषचा मृत्यू झाला. अत्यंत हृदयद्रावक बाब म्हणजे शीतल ही तीन महिन्यांची गर्भवती आहे. बाळ जगात येण्यापूर्वीच पित्याचे छत्र हरपले. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
माजी सरपंचांचा पुढाकार
केवळ सांत्वन करून न थांबता गावकऱ्यांनी सक्रिय पुढाकार घेतला. शीतलचे भविष्य सावरण्यासाठी गावातल्याच माजी सरपंच पप्पू हालगे यांनी देखील पुढाकार घेतला. तसेच शीतल आणि तिचे न जन्मलेले बाळ यांना आधार मिळावा, यासाठी शीतलचा विवाह धाकटा दीर राजेश्वर याच्याशी लावून देण्याचा प्रस्ताव मांडला.
advertisement
सुरुवातीला अडचणी पण...
विधवा वहिणीचा विवाह दीराशी लावण्यास पारंपरिक रूढी आणि परंपरांमुळे सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र, मुलाचे भविष्य आणि कौटुंबिक नाते टिकवण्यासाठी हालगे आणि गावातील मंडळींनी दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन केले. शेवटी भविष्याचा विचार करून दोन्ही कुटुंबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे 5 एप्रिल रोजी शीतल आणि राजेश्वर यांचा विवाह अत्यंत भावुक वातावरणात साध्या पद्धतीने पार पडला.
advertisement
दरम्यान, राजेश्वर याने आपल्या वहिनीचा हात हाती घेत तिच्या पोटातील बाळाची जबाबदारी स्वीकारली. त्याला वडिलांचे नाव आणि प्रेम देण्याचे आश्वस्त केले. तर विवाहाचा संपूर्ण खर्च पप्पू हालगे यांनीच उचलला. यावेळी संपूर्ण गावासाठी अन्नदानाची सोय करण्यात आली होती. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता समाजातील अनिष्ट प्रथांना छेद देणारी आणि नवा आदर्श निर्माण करणारी ठरली आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अवघ्या सहा महिन्यात कुंकू पुसलं, पोटातल्या जीवासाठी गाव सरसावलं, घेतला असा निर्णय, तुम्हीही कराल कौतुक!










