Thane Rain Update: शहापुरात मुसळधार पावसाचा कहर; तालुक्यातील 40 गावांचा संपर्क तुटला
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Thane Rain Update: शहापूर तालुक्यात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
ठाणे: राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्याला देखील हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता. जिल्ह्यात शनिवारी (27 सप्टेंबर) रात्रीपासून विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. विशेषत: शहापूर तालुक्याला पावसाने उच्छाद मांडला आहे. शहापूर-किन्हवली रस्ता बंद झाला असून 40 गावांचा संपर्क तुटला आहे. भातसा धरणाचे पाच दरवाजे अडीच मिटरने उघडण्यात आले आहेत. परिणामी धरण क्षेत्रातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. सापगावात भातसा नदीचं पाणी शिरलं असून संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने आजपासून (28 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली होती. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला होता. या अंदाजानुसार मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहापूर तालुक्यात रात्रभर पासून तुफान पाऊस पडत असल्याने सर्वदूर पाणी साचलं आहे.
advertisement
नदी-नाल्यांना पूर आल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी भातसा धरणाचे 5 दरवाजे अडीच मीटरने उघडले आहेत. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने शहापूर- सापगाव-किन्हवली रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली असून एकूण 40 गावांचा संपर्क तुटला आहे. सापगावातील अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं असून गावात पूरस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि जीवरक्षक टिमचे सदस्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
advertisement
दरम्यान, ठाणे शहराला देखील पावसाने झोडपून काढलं आहे. ठाण्यात आतापर्यंत 115 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अजूनही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असं प्रशासनाने आवाहन केलं आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 28, 2025 2:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Rain Update: शहापुरात मुसळधार पावसाचा कहर; तालुक्यातील 40 गावांचा संपर्क तुटला