आठवड्याभरापूर्वी लग्न, नववधूला आणण्यासाठी सासरी गेलेला जावई बेपत्ता; अर्ध्या वाटेत....
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
नववधूला हिंगोलीत परत आणण्यासाठी गेलेला जावई सासरवाडीत पोहोचलाच नाही. त्याची दुचाकी अर्ध्या रस्त्यात आढळून आली.
मनिष खरात, हिंगोली : आठवड्याभरापूर्वी लग्न झालेला तरुण माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेल्यानंतर बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नववधूला हिंगोलीत परत आणण्यासाठी गेलेला जावई सासरवाडीत पोहोचलाच नाही. त्याची दुचाकी अर्ध्या रस्त्यात आढळून आली, मात्र तो बेपत्ता असल्यानं कुटुंबियांची चिंता वाढलीय. या प्रकरणी पोलिसात नोंद झाली असून पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील सुकळी वीर इथला रहिवासी प्रमोद मात्रे याचं आठवड्याभरापूर्वी लग्न झालं. वसमत तालुक्यातील सुकळी कोठारी इथं त्याच्या सासरवाडी आहे. काल सकाळी तो पत्नीला आणण्यासाठी सुकळी कोठारीला गेला. दुचाकीवरून गेलेला प्रमोद सासरी पोहोचलाच नाही. त्याचा काहीच संपर्क होत नसल्यानं घरच्यांनी शोधाशोधही केली.
प्रमोदचा शोध घेण्यासाठी कुटुंबिय बाहेर पडले. वसमत तालुक्यातल्या सुकळी कोठारी इथं जात असताना वाटेतच त्याची दुचाकी आढळून आली. आजुबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेतला तरी तो सापडला नाही. शेवटी कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठून प्रमोद बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. तरुणाच्या मोबाईल फोनचं लोकेशन ट्रेस केलं जात आहे. त्याच्या आधारे प्रमोदचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 29, 2024 9:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
आठवड्याभरापूर्वी लग्न, नववधूला आणण्यासाठी सासरी गेलेला जावई बेपत्ता; अर्ध्या वाटेत....