आरक्षणाचा प्रश्न चिघळला, बंजारा समाजातील तरूणाने उचललं टोकाचे पाऊल
- Published by:Prachi Amale
- Reported by:BALAJI NIRFAL
Last Updated:
बंजारा समाजाचे शेकडो नागरिक घटनास्थळी जमले तातडीने सरकारकडे मागणी मान्य करण्याचे आवाहन केले.
धाराशिव : महाराष्ट्रात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटला मंजुरी दिल्यानंतर आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणं शक्य झाले आहे. मात्र या कारणामुळे सध्या ओबीसी समाजात आरक्षणावरुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन आणि रास्ता रोको सुरु असतानाच मुरूम शहरालगत नाईक नगर तांडा येथे 32 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पवन गोपीचंद चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत 'मुख्यमंत्री साहेब, बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्या', अशी मागणी त्याने केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घरातील मंडळींनी पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर मुरूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यावेळी मृतदेहाशेजारी आत्महत्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत समाजाला न्याय द्यावा, असा उल्लेख आहे. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
राज्यभरात सातत्याने आंदोलने
घटनेची माहिती समजताच परिसरातील बंजारा समाजाचे शेकडो नागरिक घटनास्थळी जमले तातडीने सरकारकडे मागणी मान्य करण्याचे आवाहन केले. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरात सातत्याने आंदोलने होत आहेत. विशेषतः हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या प्रकरणी राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय न घेतल्याने समाजातील तरुण निराश होत असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.
advertisement
आंदोलनाल उग्र वळण मिळण्याची शक्यता
पवन चव्हाणच्या आत्महत्येमुळे बंजारा समाजाच्या आंदोलनाला आणखी उग्र वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस व प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 3:29 PM IST