खोटी कागदपत्रे अन् झाडांची कत्तल, गावकऱ्यांचा संताप, सांगलीत हे काय सुरूये?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Solar Project: सौर प्रकल्पाच्या प्रस्तावामध्ये खोटी कागदपत्रे सादर करून गावची फसवणूक करत, बेकायदा वृक्षतोड केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेय.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राज्यभर राबवला जातो आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 28 उपकेंद्रांचा समावेश आहे. या अंतर्गत शिरसगावमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या सौर प्रकल्पाच्या प्रस्तावामध्ये खोटी कागदपत्रे सादर करून गावची फसवणूक करत, बेकायदा वृक्षतोड केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी गावाचे माजी सरपंच सतीश मांडके हे गेल्या 6 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
advertisement
सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत अधिकारी आणि कंपन्यांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत आवाज उठवला असून आंदोलनास श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर आणि दलित महासंघाचे प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. शिरसगाव येथे सौर प्रकल्पासाठी पर्यायी जागा असताना याच जागेचा अट्टहास का? सौर ऊर्जेची गरज आहे. पण लोकांच्या भावनाही तितक्याच महत्वाच्या आहेत, असं डॉ. पाटणकर यांनी म्हटलंय.
advertisement
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, “शिरसगावकरांच्या आंदोलनामध्ये उपस्थित झालेला मुद्दा हा सार्वजनिक मालमत्तेचा आहे. गायरान हे सार्वजनिक मालमत्तेपैकी एक असून त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी वंचितांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मनमानी सुरू असून जनसामान्यांचा विचार न करता विकासाच्या नावाखाली रेटारेटी सुरू असलेली दिसते. यावरून हवा आणि सूर्यप्रकाश देखील कोणाचा ताब्यात देत आहेत की काय असे वाटू लागले आहे. स्थानिक आणि सामान्य लोकांना त्रास देऊन सरकार कोणाचा विकास करू इच्छित आहे?” असा सवाल देखील डॉ. पाटणकर यांनी उपस्थित केला.
advertisement
100 महिलांचा आंदोलनात सहभाग
प्रकल्प तात्काळ बंद करावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये गावातील 100 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे. एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून या महिलांनी गायरान आणि जमिनी वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या जागेतील झाडे कंपनीने तोडल्यानंतर आंदोलक महिलांनी त्याठिकाणी वृक्षारोपण केले. यावेळी सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शेकडो झाडे लावून निषेध व्यक्त केला.
advertisement
ठेकेदार कंपनीस 2 लाख 68 हजार रुपये दंड
सौर प्रकल्पासाठी वनविभागाने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक झाडे तोडल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई केली आहे. ठेकेदार कंपनीला 268 झाडे जास्त तोडल्याप्रकरणी 2 लाख 68 हजार रुपयांचा दंड आकरण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली.
advertisement
माजी सरपंच बेमुदत उपोषणावर ठाम
शिरसगावच्या गायरान जमिनीवर खोट्या कागदपत्रांच्या आधारावर सुरू केलेले सौर प्रकल्पाचे काम रद्द करावे. 22 एकर क्षेत्रातील 30 वर्षांपासून जतन केलेल्या झाडांची कत्तल संबंधित कंपनीने कायदेशीरपणे भरून द्यावी. या मागण्यांसाठी गावचे माजी सरपंच सतीश मांडके गेल्या 6 दिवसांपासून बेमुदत उपोषणावर ठाम आहेत. दरम्यान त्यांच्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास संबंधित कंपन्या आणि सरकार जबाबदार असेल असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
advertisement
सौर प्रकल्पासाठी पर्यायी जागा असताना याच गायरानावरती प्रकल्प उभारणीस गावकऱ्यांचा विरोध आहे. दरम्यान 30 वर्षांपासून जगवलेल्या झाडांची बेकायदेशीर कत्तल झाल्याचा निषेध करत ग्रामस्थांनी शेकडो झाडांचे नव्याने वृक्षारोपण केले आहे. लोक भावनांकडे कानाडोळा करत प्रकल्प रेटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिरसगावकरांकडून देण्यात आला आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
January 18, 2025 3:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
खोटी कागदपत्रे अन् झाडांची कत्तल, गावकऱ्यांचा संताप, सांगलीत हे काय सुरूये?

