...अन् शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी रेल्वे मार्गावर बसले आंदोलनासाठी!
- Reported by:Shubham Sharad Bodake
- local18
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
चक्क शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालक आणि गावकऱ्यांसह रेल्वे महामार्ग अडवून धरला. त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, इथं अनेक क्रांतिकारी निर्णय झाले आणि देशभर क्रांती पेटली. आपल्या हक्कांसाठी हीच लढाऊ वृत्ती इथल्या आजच्या शाळकरी विद्यार्थ्यांमध्येही दिसून येते. जिल्ह्यातील काेरेगाव तालुक्याच्या बिचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थांनी 18 जून रोजी रेल्वे मार्गावर आंदोलन केलं. चक्क शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालक आणि गावकऱ्यांसह रेल्वे महामार्ग अडवून धरला. त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
advertisement
देऊर-बिचुकले या रस्त्यासाठी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी मागील अनेक दिवसांपासून रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी रेल्वेच्या भुयारी मार्गासाठी आणि देऊर-बिचुकले रस्त्यासाठी पत्रव्यवहार करून मागणी केली. परंतु रेल्वे प्रशासनानं याकडं कायम दुर्लक्ष केल्यानं दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन रेल्वे ट्रॅकवर येऊन रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालत याबाबत जाब विचारला. त्यामुळं शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी रेल्वे ट्रॅकवर आंदोलनासाठी, अशी परिस्थिती इथं पाहायला मिळाली. शिवाय यावेळी कोणताच प्रश्न मार्गी न लागल्यानं देऊर आणि बिचुकले ग्रामस्थ उग्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय.
advertisement
हेही वाचा : Satara Police Bharti 2024 : बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांची गैरसोय टळणार, याठिकाणी झाली राहण्याची सोय
विद्यार्थ्यांना रेल्वे क्रॉसिंग करून देऊळगावात जाऊन मग शाळेत जावं लागतं. त्यांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं विद्यार्थी, पालक आणि गावकऱ्यांना अक्षरश: आपला जीव मुठीत धरून रेल्वे क्रॉसिंग करावं लागतं, जे अत्यंत धोकादायक आहे. इथं एक दुर्घटना आधी घडलीसुद्धा होती. एकदा एका विद्यार्थ्याला ट्रॅक ओलांडताना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळं गावकऱ्यांनी अनेकदा रेल्वे प्रशासनाकडं भुयारी मार्ग सुरू करून द्या, अशी मागणी रीतसर पत्राद्वारे केली. मात्र रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांचा संताप अनावर झाला.
advertisement
आंदाेलक म्हणाले, रेल्वे क्रॉसिंग अंडरपासमध्ये मागील सहा महिन्यांपासून पाणी साचतंय, त्यामुळं दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरीसुद्धा रेल्वे प्रशासनानं सोयी-सुविधांचा अभाव असताना हे काम सुरूच ठेवलं. रेल्वे क्रॉसिंगमध्ये रस्ताच उपलब्ध नसल्यामुळं नागरिकांना जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅक ओलांडावा लागत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. यावर तातडीनं तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडं केली.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Jun 19, 2024 7:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
...अन् शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी रेल्वे मार्गावर बसले आंदोलनासाठी!






