Sharad Pawar: आवंढा गिळला, बोलताना अडखळले, दादांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरतच शरद पवारांची प्रतिक्रिया
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे आज (28 जानेवारी) सकाळी बारामती विमानतळावर भीषण अपघातात निधन झाले. विमानाचा अपघात झाल्यानंतर जमिनीवर कोसळल्यानंतर अक्षरश: कोळसा झाला. त्यामुळे या भयावह अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. लँडिंगच्या प्रयत्नात विमान रनवे च्या बाजूला जाऊन अपघातग्रस्त झाले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बहीण सुप्रिया सुळे या दिल्लीत होत्या. त्या तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. अजित पवार यांचे काका आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे तातडीने हेलिकॉप्टरमधून बारामतीला पोहोचले. विमानतळावर उतरताच विमान कसं आणि कुठं कोसळलं, असा पहिला प्रश्न त्यांनी तिथं उपस्थित असलेल्यांना विचारला. अपघातानंतर शरद पवारांनी याचे हा अपघात असून याचे राजकारण करून नये , असे आवाहन केले आहे.
advertisement
काय म्हणाले शरद पवार?
अजित पवारांच्या निधनाबाबत शरद पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. झालेले नुकसान कधीही भरून निघणारं नाही, हे कोणाच्या हातात नव्हतं. हा एक निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही. अजित पवार हे राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक कर्तृत्ववान नेता ज्याच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता होती, त्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज मुकला आहे. महाराष्ट्राचे हे न भरून येणारे नुकसान आहे. हा अपघात असून यामध्ये कुठलेही राजकारण नाही. हा केवळ अपघात आहे.
advertisement
पवार कुटुंबावरही दु:खाचा डोंगर
राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांचे बोट धरूनच अजित पवार हे राजकारणात कार्यरत झाले होते. शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजितदादांनी पुढे आपल्या तडफदार नेतृत्वाच्या जोरावर राज्यभर आपलं गारूड तयार केलं. मात्र आज सकाळी बारामती इथं विमान अपघातात त्यांचं दुर्दैवी निधन झालं. बारामतीकरांसाठी हा सहन न होणारा धक्का असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रोश करत आहेत. या दुर्दैवी घटनेनं पवार कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला असून अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी बारामतीच्या दिशेने धाव घेतली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
बिझनेस क्लासचा बादशाह अशी ओळख असलेल्या व्हीएसआर' या ऑपरेटरचे 'लिअरजेट 45' श्रेणीतील हे विमान.. पण, याच विमानानं अजित पवारांचा घात केला.. मुंबईहून सकाळी बारामतीच्या दिशेनं निघालेल्या विमानात सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळं विमानाचा भीषण अपघात झाला आणि यात विमानातील अजित पवारांसह पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला. एअरपोर्ट जवळील पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही थरारक दृश्यं कैद झाली आहेत. यात 8 वाजून 46 मिनिटांनी विमान कोसळताना दिसतंय.. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होतो. त्यानंतर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात पसरल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरून अपघाताची भीषणता समजून येत आहे.अपघात इतका भिषण होता की संपूर्ण परिसरात स्फोटाचे आवाज ऐकू आले... एकापाठोपाठ एक असे तीन ते चार स्फोट झाल्यानंतर दुर्घटनाग्रस्त विमानाला आग लागली होती.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 7:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar: आवंढा गिळला, बोलताना अडखळले, दादांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरतच शरद पवारांची प्रतिक्रिया









