महाराष्ट्रातील 'आष्टी शहीद' गाव माहितीये का? स्वातंत्र्यासाठी उचललं होतं मोठं पाऊल
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
महाराष्ट्रातील 'आष्टी शहीद' गावाच्या नावामागं क्रांतिकारी इतिहास आहे. जाणून घ्या ब्रिटिशांचा झेंडा जाळणाऱ्या गावाबद्दल..
वर्धा, 13 ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी गाव म्हणून वर्धा जिल्ह्याचं मोठं योगदान आहे. जिल्ह्यातील आष्टी शहीद या गावानंही स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. आष्टी शहीद या नावाचाही एक इतिहास आहे. महात्मा गांधी यांच्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याकाळात आष्टीचे काही तरुण व मध्यमवयीन स्वातंत्र्य सैनिक पोलीस ठाण्याजवळ सत्याग्रहाला बसले होते. त्यावेळी 16 ऑगस्ट 1942 ला नागपंचमी होती. शांततेत आंदोलन सुरू असताना ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळीबार केला यात काही सत्याग्रही ठार झाले.
पुढे काय झालं?
त्यानंतर नागरिकांची एकजूट वाढली आणि ब्रिटिशांच्या पोलीस ठाण्यावर मोर्चाच काढला. त्यांनी इंग्रजांचे पोलीस ठाणे आणि त्यावरील ‘युनियन जॅक’ जाळला. त्या दिवसभर पोलीस ठाण्यावर युनियन जॅक नव्हे तर भारताचे प्रतिनिधीत्व करणारा झेंडा फडकत होता! त्या दिवसापुरते आष्टी हे गाव स्वतंत्र झाले होते! अशी माहिती देण्यात येते. या संदर्भात अधिक माहिती आष्टीच्या हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष भरत वंजारा यांनी दिली आहे.
advertisement
वर्धा जिल्हा लहान पण कीर्ती महान
महाराष्ट्र राज्यामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्हा जरी लहान असला तरी त्याची प्रसिद्धी आणि कीर्ती ही महान आहे. 1942 हे वर्षही वर्ध्याच्या आष्टीसाठी महत्वाचं आहे. आष्टी हे गाव भारतीय स्वातंत्र्य चळवळीद्वारे ब्रिटीश साम्राज्याविरूद्ध स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत होतं. या संघर्षात अनेकांना वीरमरण आलं. म्हणून 16 ऑगस्ट हा दिन हुतात्मा दिन म्हणून आष्टी येथे पाळला जातो. वर्धा जिल्ह्यातील आष्टी, पेठ, अमडापूर, वडाला, खडकी, साहूर, आर्वी, वर्धा, सेवाग्राम येथे हुतात्मा स्मारक आहेत. स्वातंत्र्यसंग्रामात आष्टीतील अनेक तरुण शहीद झाले. त्यामुळे आष्टीला शहिदांची भूमी म्हणूनही ओळखलं जातं.
advertisement
शहिदांना वाहिली जाते श्रद्धांजली
दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, क्रांती दिन यासारख्या महत्त्वाच्या दिवशी शहीद वीरांना स्मरणात ठेवून त्यांना आदरांजली वाहिले जाते. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात सुरू असणाऱ्या ऑगस्ट क्रांती आंदोलनात त्या काळात आष्टीच्या अनेक वीरांचा सहभाग होता. या गावकऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. त्यामुळे आष्टीचा स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास आजही नागरिकांना अंगावर काटा आणणारा आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
August 13, 2023 9:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
महाराष्ट्रातील 'आष्टी शहीद' गाव माहितीये का? स्वातंत्र्यासाठी उचललं होतं मोठं पाऊल