ट्रम्प यांना मिरची झोंबली, भारताकडून अमेरिकेच्या हुकमी एक्क्यावर घाव; प्रकरण WTOमध्ये पोहोचले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Trade War: अमेरिकेने लादलेल्या अन्यायकारक व्यापार शुल्कामुळे भारत आता आक्रमक भूमिकेत आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अमेरिकेला भारताने जशास तसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.
नवी दिल्ली : सध्या अमेरिकेने जगातील अनेक देशांना डोकेदुखी करून ठेवली आहे. सुरुवातीला सर्वच देशांवर आयात शुल्क लादले आणि नंतर ते 90 दिवसांसाठी पुढे ढकलले. चीनवर मोठे कर लावले पण आता त्यांच्याशी बोलणी करत आहे. भारतासोबत त्याचे संबंध चांगले दिसत असले तरी सत्य काही वेगळेच आहे.
अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियमांचे उल्लंघन करून भारतातून जाणाऱ्या स्टीलवर 25% आणि ॲल्युमिनियमवर 10% शुल्क लावले आहे. विशेष म्हणजे या शुल्काबाबत दोन्ही देशांमध्ये कोणतीही अधिकृत चर्चा किंवा करार झालेला नाही. आता भारतानेही अमेरिकेला त्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताने जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेतून येणाऱ्या 29 वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
advertisement
भारताने प्रस्तावित केलेल्या 29 उत्पादनांमध्ये सफरचंद, बदाम, नाशपाती, अँटी-फ्रीजिंग उत्पादने, बोरिक ॲसिड आणि लोखंड-स्टीलपासून बनवलेल्या काही वस्तूंचा समावेश आहे. अमेरिकेने हे शुल्क राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर भारताचे मत आहे की हे शुल्क जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांच्या विरोधात आहे. भारताचे म्हणणे आहे की अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या 7.6 अब्ज डॉलरच्या आयातीवर परिणाम होईल आणि भारताला 1.91 अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागेल.
advertisement
व्यापारिक संतुलन साधण्याचा प्रयत्न
या संभाव्य नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेतून येणाऱ्या काही उत्पादनांवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक प्रकारे व्यापारिक संतुलन साधण्याचा प्रयत्न आहे. भारताने जागतिक व्यापार संघटनेला सांगितले आहे की ते हे शुल्क 30 दिवसांनंतर लागू करू शकतात आणि गरज पडल्यास या उत्पादनांच्या यादीत किंवा शुल्काच्या दरात बदल देखील करू शकतात. भारताचे म्हणणे आहे की अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे पालन केले नाही. कारण त्यांनी हे शुल्क लावण्यापूर्वी संघटनेला कोणतीही माहिती दिली नाही आणि भारतासोबत यावर चर्चाही केली नाही.
advertisement
भारतालाही शुल्क लावण्याचा अधिकार
भारताचा असा विश्वास आहे की अमेरिकेचे हे पाऊल जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार नियमां (GATT 1994 आणि AoS करार) च्या विरोधात आहे. त्यामुळे भारत आता अमेरिकेतून येणाऱ्या काही उत्पादनांवर कर वाढवण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून व्यापारात झालेल्या नुकसानीची भरपाई करता येईल. भारताने जागतिक व्यापार संघटनेला सांगितले आहे की त्यांच्याकडे हे कर लावण्याचा अधिकार आहे आणि गरज पडल्यास भविष्यात या नियमांमध्ये बदल किंवा विस्तार करण्याची क्षमता आहे.
advertisement
भारताचा हा निर्णय अशा वेळी आला आहे. जेव्हा अमेरिकेने भारत आणि इतर अनेक देशांवर (चीन वगळता) 10 टक्के अतिरिक्त कर लावला आहे. तथापि भारतासाठी 26 टक्क्यांपर्यंतचा आणखी जास्त कर लावण्याची योजना सध्या 9 जुलैपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे.
दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावर बोलणी सुरू आहे. दोन्ही देश 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट्यावर काम करत आहेत. या संदर्भात भारताचे व्यापार अधिकारी लवकरच अमेरिकेला भेट देऊन चर्चा करणार आहेत. आता भारताच्या या नवीन प्रस्तावावर अमेरिकेची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 4:07 PM IST
मराठी बातम्या/मनी/
ट्रम्प यांना मिरची झोंबली, भारताकडून अमेरिकेच्या हुकमी एक्क्यावर घाव; प्रकरण WTOमध्ये पोहोचले