India vs Pakistan: शेअर मार्केटवर थेट परिणाम, पैसे काढावे की थांबावे? भारत-पाक तणावावर एक्सपर्टने दिला सल्ला
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
India vs Pakistan Tension impact on share market भारत-पाकिस्तान संघर्षामुळे कराची शेअर मार्केटला लोअर सर्किट लागलं. भारतीय शेअर बाजारातही चढ-उतार दिसले. नीलेश शाह यांच्या मते, तणावामुळे बाजारात गडबड होते पण दीर्घकालीन गुंतवणुकीवर परिणाम होत नाही.
भारत पाकिस्तान संघर्ष थांबण्याची सध्या कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. कराची शेअर मार्केटला लोअर सर्किट लागलं आणि बंद करण्याची वेळ आली. गुंतवणूकदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर मार्केटचं काय होणार? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनात आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढत असतानाच, संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेवर केंद्रित झाले आहे.
या तणावामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारावर स्पष्ट परिणाम पाहायला मिळाला. दिवसभर बाजारात चढ-उतार दिसत होते, मात्र शेवटच्या तासात जोरदार विक्री झाली आणि शेवटी सेन्सेक्स व निफ्टी सुमारे 1% नी खाली आले. या घसरणीचा सर्वाधिक फटका मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरना बसला. रिअल्टी, मेटल, ऑटो आणि सार्वजनिक क्षेत्रातील शेअर सर्वसाधारणपणे कमकुवत दिसले. तेल-गॅस आणि फार्मा क्षेत्रातही दबाव जाणवत होता. बाजारातील अनिश्चिततेचा प्रमुख निर्देशक India VIX सुमारे 14 टक्क्यांनी वाढला, जे स्पष्ट सूचक आहे की गुंतवणूकदार सध्या सावध झाले आहेत.
advertisement
या पार्श्वभूमीवर, कोटक AMC चे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह यांनी CNBC आवाज या व्यवसायिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना खास महत्त्वाचे निरीक्षण मांडले. त्यांच्या मते, भारताने नेहमीच नियंत्रण रेषेचा (LoC) सन्मान केला आहे आणि कारगिल युध्दासारखे मर्यादित संघर्षही दीर्घकालीन गुंतवणुकीवर फारसा परिणाम करत नाहीत.
नीलेश शाह यांनी CNBC आवाजला दिलेल्या वृत्तानुसार, “प्रत्येक बाजारातील करेक्शन म्हणजे गुंतवणुकीची संधी असते.” त्यांनी याआधीही याचे पुरावे पाहिले आहेत की युद्ध किंवा सैन्य तणावामुळे बाजारात काही काळ गडबड होते, पण लवकरच बाजार पुन्हा स्थिर होतो आणि अनेकदा आधीच्या पातळीपेक्षा अधिक चांगले प्रदर्शन करतो.
advertisement
आज भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. गुंतवणूकदारांसाठी भारत हा एक स्थिर, भरोसेमंद आणि भविष्यातील संधींनी भरलेला बाजार आहे. या देशातील आर्थिक धोरणं, सरकारची वित्तीय जबाबदारी आणि जागतिक व्यासपीठावर भारताचा वाढता प्रभाव यामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक दृढ होत चालला आहे.
त्याचवेळी पाकिस्तानची स्थिती मात्र वेगळी आहे. IMF करारात विलंब, FATF कडून येणारा दबाव, आणि अतिरेकी कारवायांबाबत जागतिक समुदायाने घेतलेली कठोर भूमिका – या सगळ्यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पटलावर एकटाच उरला आहे. नीलेश शाह म्हणतात की, “आज संपूर्ण जग पाकिस्तानवर दबाव आणत आहे.”
advertisement
तणाव आणि अस्थिरता या संज्ञा बाजारासाठी नवीन नाहीत. मात्र, अनुभवी गुंतवणूकदार त्याकडे भीतीने नाही, तर संधीच्या नजरेने पाहतात. शॉर्ट टर्ममध्ये बाजारात चढ-उतार होऊ शकतात, पण जर मूलभूत अर्थव्यवस्था मजबूत असेल, तर लॉन्ग टर्ममध्ये त्याचा फायदा मिळतोच. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार नीलेश शाह यांच्या सल्ल्यानुसार, या काळात गुंतवणूक करताना घाई न करता, समजूतदार दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. तणाव ओसरल्यावर जे गुंतवणूकदार बाजारात टिकून राहतात, तेच पुढे लाभात राहतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 09, 2025 9:05 AM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
India vs Pakistan: शेअर मार्केटवर थेट परिणाम, पैसे काढावे की थांबावे? भारत-पाक तणावावर एक्सपर्टने दिला सल्ला