गावी निघाला आहात तर बस स्थानकावर सावध राहा, मुंबईत घडली धक्कादायक घटना
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
मुंबई, 10 नोव्हेंबर, विजय वंजारा : बोरीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एसव्ही रोडवर दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी बसस्थानकामध्ये आलेल्या नागरिकांचे मोबाईल लांबवले आहेत. बोरीवली पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या अनेक घटनांची नोंद झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश कदम व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला.
मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपी बोरिवली लॉकअपजवळ फिरत असल्याची गुप्त माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्या झडतीदरम्यान आठ मोबाईल जप्त करण्यात आले. अधिक तपास केल्यानंतर बोरिवली पोलिसांनी आरोपींकडून एकूण 27 मोबाईल जप्त केले आहेत. ज्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. या मोबाईल चोर टोळीतील चार आरोपी अद्याप फरार आहेत. बोरिवली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
advertisement
वसीम रईस अहमद शेख उर्फ मसा (30), मीत तुळशीराम शिंदे (23) आणि नीलेश जगदीश पटेल उर्फ कन्या (32) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपी मालाड पश्चिम मालवणी येथील रहिवासी आहेत. या तिघांवरही मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2023 3:37 PM IST


