लातूर-मुंबई प्रवास अवघ्या साडेचार तासांत, सरकारचा 35 हजार कोटींचा प्लॅन, लवकरच सुपर हायवे!
- Reported by:BHAVNA ARVIND KAMBLE
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Latur Mumbai Expressway: मराठवाडा ते मुंबईला कनेक्ट करणारा नवा सुपर हायवे लवकरच तयार होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.
मुंबई: महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या लातूर–कल्याण जनकल्याण द्रुतगती मार्गाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. या महामार्गामुळे लातूर ते मुंबईचा प्रवास अवघ्या साडेचार तासांत पूर्ण होणार आहे. सुमारे 442 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती मार्गासाठी अंदाजे 35 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) राबविण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे लातूरसह संपूर्ण मराठवाडा विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. औद्योगिकीकरण, व्यापार, दळणवळण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार असून मालवाहतूक सुलभ होऊन उद्योगांना गती मिळेल. लातूर, अहिल्यानगर, पुणे, नांदेड तसेच मुंबई महानगर क्षेत्र यांच्यातील अंतर व वेळ दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
advertisement
या द्रुतगती मार्गात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून कल्याणमार्गे मुंबईकडे जाणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लातूर–अहिल्यानगर–माळशेज घाट–बदलापूर मार्गे वडोदरा एक्स्प्रेस वेवरील बोगद्यातून थेट पनवेल–जेएनपीटीपर्यंत जोडणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे अटल सेतू किंवा मुंबई–गोवा द्रुतगती मार्गावरून वाहनांना कोणत्याही अडथळ्याविना मुंबईत प्रवेश करता येणार आहे.
या प्रकल्पासाठी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. 6 ऑगस्ट रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे.
advertisement
मुंबई-हैदराबाद अंतर कमी होणार
मुंबई-हैदराबाद अंतर हे 717 किलोमीटर आहे. परंतु, नव्या द्रुतगती महामार्गामुळे हे अंतर 590 किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे मुंबई-हैदराबाद प्रवासासाठी देखील वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 16, 2025 1:26 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
लातूर-मुंबई प्रवास अवघ्या साडेचार तासांत, सरकारचा 35 हजार कोटींचा प्लॅन, लवकरच सुपर हायवे!










