Ulhasnagar Firing : 'कायदा हातात घेणाऱ्यांना..' उल्हासनगर गोळीबार प्रकरणात पवारांची तिखट प्रतिक्रिया, म्हणाले..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ulhasnagar Firing : उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी झालेल्या गोळीबार प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. जुन्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला, त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांचा सरकारला टोला
शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत, त्यांच्याकडून कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळीक आहे, असे जे ऐकायला मिळते ते वास्तव आहे असे गोळीबाराच्या घटनेवरुन दिसते. अशा प्रकारच्या घटना व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची बघ्याची भूमिका असेल तर आज महाराष्ट्र कोणत्या दिशेला जात आहे त्याचं हे उदाहरण आहे. अशा गोष्टी घडणे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे, असं मत पवार यांनी मांडलं आहे.
advertisement
पोलीस ठाण्यात गोळीबार
भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू होता. या वादाबाबत दोन्ही पक्षांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. जिथे वाद सुरू असताना भाजप आमदाराने शिवसेना नेते महेश यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. गोळीबारात महेश व्यतिरिक्त आणखी एक नेता राहुल पाटील हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर दोन्ही नेत्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.
advertisement
'अशा गोष्टी घडणे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.' कल्याण येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंता व्यक्त केली.
आज पत्रकारांशी संवाद साधताना… pic.twitter.com/nQ1NIgFwM5
— NCP (@NCPspeaks) February 3, 2024
advertisement
3 जणांना अटक तिघांचा शोध सुरू
या गोळीबार प्रकरणी हिल लाईन पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. एकूण 10 राऊंड गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि अन्य दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 3 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित 3 आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आयपीसी आयओ कलम 307, 120 बी, 143, 147, 148, 149, 109, 323, 504 आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
advertisement
घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना कल्याणमध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती दिलीय. दरम्यान, या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर स्पष्टीकरणही दिलं होतं. पण अप्पर पोलीस आयुक्तांनी आमदारांच्या स्पष्टीकरणाचं खंडन केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2024 6:18 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ulhasnagar Firing : 'कायदा हातात घेणाऱ्यांना..' उल्हासनगर गोळीबार प्रकरणात पवारांची तिखट प्रतिक्रिया, म्हणाले..







