मुंबईचा वडा-पाव वाचवा! पावाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या; भाजप नगरसेवकाचे थेट फडणवीसांना साकडे
- Reported by:PRANALI KAPASE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पाव हा लाखो मुंबईकरांचा मुख्य अन्नघटक आहे आणि वडापाव, पावभाजी तसेच इतर अनेक स्ट्रीट फूड पदार्थांसाठी तो आधारभूत घटक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई: इराण- इस्त्राईल युद्धामुळे उद्भवलेल्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या टंचाईचे चटके आता थेट मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या 'पाव'ला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील बेकऱ्यांना होणारा गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरात पाव आणि ब्रेडचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. एवढच नाही तर नार्वेकर यांनी सरकारला बेकरीसाठी लागणारा इंधनपुरवठा अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित करण्याची तसेच लाकूड, कोळसा आणि डिझेलवर चालणाऱ्या ओव्हनचा तात्पुरता वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.
फडणवीस आणि गगराणी यांना पाठवलेल्या पत्रात नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी म्हटले आहे की, व्यावसायिक LPG सिलिंडरच्या अनियमित पुरवठ्यामुळे मुंबईत पाव आणि ब्रेडची टंचाई निर्माण होत आहे. मुंबईतील सुमारे 800 बेकऱ्यांपैकी जवळपास 350 मोठ्या बेकऱ्या आता गॅसवर चालणाऱ्या ओव्हनवर अवलंबून आहेत आणि त्या मिळून शहरातील जवळपास 70% पाव आणि ब्रेडचा पुरवठा करतात. महापालिकेच्या निर्देशांनुसार गॅसवर चालणाऱ्या ओव्हनचा अवलंब केलेल्या अनेक बेकऱ्यांना सध्या गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस-आधारित प्रणाली स्वीकारल्यानंतर अनेक बेकऱ्यांनी आपले पारंपरिक लाकूडफाटा वापरणारे ओव्हन नष्ट केले आहेत.
advertisement
काय म्हटलं नेमकं भाजप नगरसेवकाने?
सध्याच्या परिस्थितीत बेकऱ्यांना विद्यमान उपकरणांमध्ये बदल करून लाकूड, कोळसा किंवा डिझेलवर चालणाऱ्या पर्यायी ओव्हन प्रणालींचा तात्पुरता वापर करावा लागू शकतो. त्यामुळे LPG चे प्राधान्याने वाटप बेकरीसाठी होण्यासाठी अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित करण्याची गरज आहे. तसेच LPG पुरवठ्याची परिस्थिती स्थिर होईपर्यंत लाकूड, कोळसा आणि डिझेलवर चालणाऱ्या ओव्हनचा तात्पुरता वापर करण्यास परवानगी द्यावी आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत योग्य अधिकारांचा वापर करावा, असेही भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी नमूद केले आहे.
advertisement
हजारो विक्रेत्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम
नार्वेकर यांनी पुढे सांगितले की, पाव हा लाखो मुंबईकरांचा मुख्य अन्नघटक आहे आणि वडापाव, पावभाजी तसेच इतर अनेक स्ट्रीट फूड पदार्थांसाठी तो आधारभूत घटक आहे. त्यावर सर्वसामान्य जनता अवलंबून आहे. पाव उत्पादनात कोणताही अडथळा निर्माण झाल्यास अन्नउपलब्धतेवर तसेच हजारो विक्रेत्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होईल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 5:48 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईचा वडा-पाव वाचवा! पावाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या; भाजप नगरसेवकाचे थेट फडणवीसांना साकडे










