मुंबई–नाशिक महामार्गावर मोठा वाहतूक बदल, हा भुयारी मार्ग 4 महिने बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
मुंबई–नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वाहनचालकांना पुढील चार महिने मोठ्या वाहतूक बदलांना सामोरं जावं लागणार आहे.
मुंबई : मुंबई–नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वाहनचालकांना पुढील चार महिने मोठ्या वाहतूक बदलांना सामोरं जावं लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू असलेल्या या प्रकल्पाचा भाग म्हणून खारेगाव भुयारी मार्गावर महत्त्वाची कामं हाती घेण्यात येणार असून, त्यामुळे आज म्हणजेच 15 डिसेंबरपासून या मार्गावर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मुंबई, ठाणे, कळवा, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणारी हजारो वाहने दररोज मुंबई–नाशिक महामार्गाचा वापर करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून या महामार्गावरील माजिवडा ते वडपे या पट्ट्यात रस्त्याची अरुंदता, वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
रस्त्यात अडवत 'पोलिसांनी' काढायला सांगितली गळ्यातील सोनसाखळी; पुण्यातील वृद्धासोबत पुढं विचित्र घडलं
advertisement
खारेगाव भुयारी मार्गावर प्रवेशबंदी
या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात खारेगाव भुयारी मार्ग परिसरात संरचनात्मक व तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरून होणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, खारेगाव भुयारी मार्गाचा वापर वाहनचालकांना पुढील चार महिने करता येणार नाही.
वाहतूक कशी वळवली जाणार?
मुंबई–नाशिक महामार्गावरून खारेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव भुयारी मार्गात प्रवेश दिला जाणार नाही. ही वाहने पर्यायी मार्ग म्हणून खारेगाव टोलनाका, गॅमन रोड आणि पारसिक चौक मार्गे किंवा साकेत येथून खाडी पूल मार्गे आपली वाहतूक करू शकतील.
advertisement
तसेच, खारेगाव भुयारी मार्गाचा वापर करून भिवंडी किंवा ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही या मार्गावर प्रवेशबंदी असेल. भिवंडीच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव, पारसिक चौक आणि गॅमन रोड मार्गे वळवण्यात येणार आहेत. तर ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कळवा खाडी पूल हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
9 एप्रिल 2026 पर्यंत वाहतूक बदल कायम
ठाणे वाहतूक नियंत्रण विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार हे वाहतूक बदल 15 डिसेंबर 2025 पासून 9 एप्रिल 2026 पर्यंत लागू असतील. या कालावधीत हे निर्बंध 24 तास लागू राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
advertisement
वाहनचालकांनी दक्षता घेण्याचे आवाहन
view commentsरुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई–नाशिक महामार्गावरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असली, तरी सध्या या कामामुळे वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाने सुचवलेल्या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 8:32 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई–नाशिक महामार्गावर मोठा वाहतूक बदल, हा भुयारी मार्ग 4 महिने बंद, पर्यायी मार्ग कोणते?










