रतन टाटा जिवंत असते तर... आज ही वेळ आली नसती; अहमदाबाद विमान अपघातातील हृदय पिळवटणारी कहाणी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Air India plane crash: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हयात असते तर एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांना नुकसानभरपाई मिळण्यास एवढा विलंब झाला नसता, अशी खंत अमेरिकेतील वकील माईक एंड्रयूज यांनी व्यक्त केली. त्यांनी एअर इंडियाच्या भरपाई प्रक्रियेवर कठोर टीका केली आहे.
नवी दिल्ली: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा जिवंत असते तर एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यासाठी कंपनीने विलंब केला नसता, असे मत अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 65 पेक्षा जास्त कुटुंबांची बाजू मांडणारे अमेरिकेचे ॲटर्नी माईक एंड्रयूज यांनी व्यक्त केले. नुकसानभरपाई देण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी एअर इंडियावर टीका केली. रतन टाटा जिवंत असते, तर नुकसानभरपाईसाठी पीडितांना अशा 'नोकरशाहीच्या प्रक्रियेचा' सामना करावा लागला नसता, असे ते म्हणाले.
रविवारच्या एका मुलाखतीत एंड्रयूज यांनी रतन टाटा यांच्या कार्यशैलीची आणि नम्र स्वभावाची प्रशंसा केली. ते म्हणाले, अमेरिकेतही आम्हाला रतन टाटा कोण होते हे माहिती आहे. त्यांची कार्यशैली, नम्रता आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याकडे असलेले त्यांचे लक्ष याबद्दल आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आज ते असते तर आम्हाला वाटत नाही की कर्मचाऱ्यांना, पीडितांना आणि विमान तसेच जमिनीवर असलेल्या लोकांना नुकसानभरपाईसाठी अशी नोकरशाही प्रक्रिया आणि विलंब सहन करावा लागला असता.
advertisement
वकिलांनी सांगितले एका वृद्ध महिलेचे दुःख
या अमेरिकन वकिलांनी एका कुटुंबाचे उदाहरण दिले. एका वृद्ध महिलेचा मुलगा अपघातात मरण पावला आणि ती तिच्या उपचारांसाठी मुलावर अवलंबून होती. आता तिला नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. एंड्रयूज यांनी सांगितले की, आम्ही एका कुटुंबाला भेटलो. त्यांची वृद्ध आई अंथरुणाला खिळलेली होती आणि तिच्या आरोग्याच्या गरजांसाठी मुलावर अवलंबून होती. आता तो मुलगा राहिला नाही. तिला नुकसानभरपाई मिळाली नाही. आता त्यांनी काय करावे? ज्या व्यक्तीवर ती अवलंबून होती, त्याचा कोणताही दोष नसताना मृत्यू झाला आहे.
advertisement
विमान उड्डाणानंतर लगेचच झाला होता अपघात
65 हून अधिक कुटुंबांनी अमेरिकेतील बेस्ली एलन या लॉ फर्मच्या माध्यमातून एअर इंडिया आणि विमान निर्माता कंपनी बोईंग विरुद्ध अमेरिकेच्या फेडरल कोर्टात याचिका दाखल केली आहे. बेस्ली एलनचे एव्हिएशन ॲटर्नी माईक एंड्रयूज यांनी या प्रकरणाचा ताबा घेतला आणि अहमदाबादमधील मेघानीनगर भागातील अपघातस्थळाला भेट दिली.
26 जुलै रोजी एअर इंडियाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 229 प्रवाशांपैकी 147 आणि जमिनीवर मरण पावलेल्या 19 लोकांपैकी इतर 19 कुटुंबांना 25 लाख रुपयांची अंतरिम नुकसानभरपाई दिली आहे. 12 जून रोजी एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI171 बोईंग 787-8 हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच कोसळले. या अपघातात 229 प्रवासी, 12 कर्मचारी सदस्य आणि 19 इतर व्यक्ती अशा एकूण 260 लोकांचा मृत्यू झाला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 8:21 PM IST
मराठी बातम्या/देश/
रतन टाटा जिवंत असते तर... आज ही वेळ आली नसती; अहमदाबाद विमान अपघातातील हृदय पिळवटणारी कहाणी


