25 मीटर उंच लाटा अन् पुढच्या क्षणी समुद्रानं गिळली अख्खी ट्रेन, 59 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Dhanushkodi Train Accident: २२ डिसेंबर १९६४ च्या चक्रीवादळात पंबन-धनुषकोडी पॅसेंजर ट्रेन समुद्रात बुडाली, शंभराहून अधिक प्रवासी हरवले, धनुषकोडी शहर नकाशावरून पुसलं गेलं.
22 डिसेंबरची ती काळी रात्र, प्रवासी झोपेत होते, साधारण रात्री 11.50 मिनिटांची वेळ असेल प्रवासी गाढ झोपेत होते, ट्रेन सुस्साट धावत होती, अचानक असं काही घडलं की सारं काही 10 मिनिटांत उद्ध्वस्त झालं. ती रात्र कोणीच विसरु शकणार नाही, इतकी भयंकर होती. 59 वर्षांपूर्वी घडलेला अपघात काळजात खोलवर जखम करून राहिला आहे. त्या रात्रीची आठवण आजही अंगावर काटा आणते.
पंबनहून धनुषकोडीकडे निघालेली एक पॅसेंजर ट्रेन, नेहमीसारखीच. डब्यांमध्ये गावाकडे परतणारे लोक, काही कुटुंबं, काही प्रवासी. कुणी झोपलेलं, कुणी खिडकीतून बाहेर पाहत बसलेलं. काही जण रामेश्वर दर्शन करून परतले होते, काहींनी धनुषकोडी स्टेशन गाठायचं होतं. 13 किमीचा प्रवास होता. कुणालाही कल्पना नव्हती की हा प्रवास आयुष्यातला शेवटचा ठरणार आहे. समोर समुद्र शांत दिसत होता आणि अंधारात काहीही धोक्याची चाहूल नव्हती.
advertisement
मात्र मध्यरात्रीच्या सुमारास निसर्गाने अचानक रौद्र रूप धारण केलं. भीषण चक्रीवादळाने संपूर्ण परिसर हादरवून सोडला. समुद्रात सुमारे २५ मीटर उंचीच्या प्रचंड लाटा उसळू लागल्या. वारे तब्बल २४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहू लागले. ट्रेन धनुषकोडी स्टेशनच्या अगदी जवळ पोहोचली होती. लोकोपायलट काही समजून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच समुद्राच्या लाटांनी संपूर्ण ट्रेनला वेढून टाकलं. काही क्षणांतच सहा डब्यांची ती ट्रेन पटर्यांवरून उचलली गेली आणि लाटांसोबत थेट समुद्रात ओढली गेली. शंभराहून अधिक प्रवासी त्या समुद्राच्या पाण्यात कुठे गेले ते कुणालाच कळलं नाही.
advertisement
त्या चक्रीवादळाने धनुषकोडी शहर अक्षरशः नकाशावरून पुसून टाकलं. रेल्वे स्टेशन, रुग्णालय, चर्च, शाळा, मंदिरे, पोस्ट ऑफिस… सगळं काही समुद्रात वाहून गेलं. जे उरलं, ते फक्त उद्ध्वस्त अवशेष. आजही तिथे उभं असलेलं मोडकळीस आलेलं स्टेशन, तुटलेलं चर्च आणि पडलेले भिंतींचे सांगाडे त्या भयाण रात्रीची साक्ष देत उभे आहेत. ज्या चर्चमध्ये त्या दिवशी ख्रिसमसची तयारी सुरू होती, तिथे आज फक्त भयाण शांतता आहे. प्रत्येक क्षण त्या घटनेची आठवण पुन्हा पुन्हा करून देतो.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे, हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा आधीच दिला होता. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून ट्रेन रवाना करण्यात आली. ही एक मोठी चूक ठरली. या चक्रीवादळाचा परिणाम श्रीलंकेपर्यंत झाला, पण सर्वाधिक हानी धनुषकोडीत झाली. या घटनेनंतर रामेश्वरम ते धनुषकोडी ही रेल्वे सेवा कायमची बंद करण्यात आली. समुद्रात बुडालेले डबे आणि त्यातले प्रवासी आजतागायत सापडले नाहीत.
advertisement
आज धनुषकोडी भारताचं शेवटचं गाव म्हणून ओळखलं जातं. दिवसाच्या वेळेत पर्यटक इथे येतात, पण सूर्य मावळला की गाव ओस पडतं. स्थानिक लोक रात्री इथे थांबत नाहीत. कारण ही जमीन अजूनही त्या वेदनांनी भरलेली आहे. समुद्राकडे पाहिलं की ती रात्र आठवते, आणि शांत दिसणाऱ्या लाटांमागे दडलेली ती भीषण कथा मन सुन्न करून जाते. ५९ वर्षांपूर्वी समुद्राने गिळलेली ती रेल्वे आजही भारतीय रेल्वे इतिहासातील सर्वात भयावह आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनांपैकी एक आहे.
view commentsLocation :
Tamil Nadu
First Published :
Dec 23, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/देश/
25 मीटर उंच लाटा अन् पुढच्या क्षणी समुद्रानं गिळली अख्खी ट्रेन, 59 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?







