भारतीय लष्कराला हल्ला करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य; कसे, कुठे आणि कधी प्रत्युत्तर द्यायचे Indian Army ठरवेल: PM मोदी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Indian Armed Forces: दहशतवादाला चिरडून टाकण्याचा भारताचा राष्ट्रीय संकल्प असून, सशस्त्र दलांना प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यदलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली: दहशतवादाला सडेतोड आणि चिरडून टाकणारे प्रत्युत्तर देणे हा भारताचा राष्ट्रीय संकल्प आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय सशस्त्र दलांच्या व्यावसायिक क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास आणि खात्री असल्याचे सांगत, त्यांना दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी संपूर्ण स्वातंत्र्य (Operational Freedom) देण्यात आले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतच्या सीमेवरील तणावादरम्यान दिल्लीत खूप गोंधळ आहे. भारताने याआधीच पाकिस्तानबद्दल काही कठोर निर्णय घेतले होते. त्यानंतर आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
मोदींच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत तिन्ही सैन्याच्या प्रमुखांनीही भाग घेतला. ही बैठक सुमारे एक तास चालली. यानंतरही राजनाथ सिंह बराच वेळ पंतप्रधानांसोबत बसून राहिले. पहलगाम हल्ल्यानंतर राजनाथ सिंह यांची पंतप्रधान मोदींशी ही चौथी भेट आहे. गेल्या 12 तासांत पंतप्रधान मोदी राजनाथ सिंह यांना भेटण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
advertisement
दहशतवादाविरोधात कठोर भूमिका
पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध भारताची शून्य-सहिष्णुता (Zero Tolerance) भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. त्यांनी स्पष्ट केले की, दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही आणि त्याला मुळापासून उखडून टाकण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. दहशतवादाला चिरडून टाकणारा प्रहार करणे, हा आमचा राष्ट्रीय संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सशस्त्र दलांवर पूर्ण विश्वास
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्यावर आणि त्यांच्या व्यावसायिक क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, मला भारतीय सशस्त्र दलांच्या व्यावसायिक क्षमतांवर पूर्ण विश्वास आणि खात्री आहे. यातून मोदींनी सैन्यदलांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला आणि सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला.
advertisement
कारवाईचे सर्वाधिकार सैन्यदलांना
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दहशतवादाला प्रत्युत्तर कसे, कुठे आणि कधी द्यायचे, याचे सर्वाधिकार सशस्त्र दलांना देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, सैन्यदलांना आपल्या प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचे पूर्ण कार्यान्वयन स्वातंत्र्य आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की, संभाव्य कारवाईची रणनीती आखण्याचे आणि ती अंमलात आणण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आता भारतीय सैन्यदलांना असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 29, 2025 7:34 PM IST
मराठी बातम्या/देश/
भारतीय लष्कराला हल्ला करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य; कसे, कुठे आणि कधी प्रत्युत्तर द्यायचे Indian Army ठरवेल: PM मोदी