'फक्त वादाचा मुद्दा...' मनुस्मृती प्रकरणावरून गदारोळ, शरद पोंक्षेंनी जोडले हात; VIDEO शेअर करत म्हणाले...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sharad Ponkshe: मनुस्मृतीबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्यानंतर आता शरद पोंक्षे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील स्पष्टवक्ते आणि आपल्या परखड विचारांसाठी सतत चर्चेत असणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच त्यांनी नागपुरातील एका व्याख्यानात केलेल्या वक्तव्यामुळे वाद उभा राहिला होता. मनुस्मृतीबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्यानंतर आता शरद पोंक्षे यांनी आपली भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.
काही दिवसांपूर्वी नागपुरात पार पडलेल्या 'रामस्मरण' व्याख्यानमालेत बोलताना पोंक्षे म्हणाले होते, "मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही. ती जाळणाऱ्यांनीही ती वाचली नाही, वाचली असती तर ते जाळूच शकले नसते." पोंक्षे यांच्या वक्तव्यामुळे बहुजन समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, खुद्द भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली होती, त्यामुळे पोंक्षे यांचं हे विधान थेट भारतातील महान पुरुषाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं असल्याचं मत अनेकांनी मांडलं.
advertisement
मनुस्मृतीबद्दल केलेल्या वक्तव्यावर मागितली माफी
तथापि, हा वाद वाढल्यानंतर आता शरद पोंक्षे यांनी नरमाईची भूमिका घेत 'कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा', असं म्हणत जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं, "नेहमीप्रमाणेच माझं वक्तव्य मीडियाने तोडून-मोडून आणि सोयीनुसार कापून दाखवलं आहे. समाजात वाद कसा निर्माण होईल, याचीच काळजी जणू काही लोक घेत असतात. माझं संपूर्ण भाषण कोणीही दाखवत नाही, फक्त वादाचा मुद्दा हायलाईट केला जातो."
advertisement
पोंक्षे पुढे म्हणाले, "जर माझ्या 'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती' या शब्दामुळे माझे बंधू-भगिनी दुखावले गेले असतील, तर मी मनापासून माफी मागतो. मला हिंदू धर्मातील सर्व जाती-पातीच्या भिंती पाडून एकसंध हिंदू समाज पाहायचा आहे, हाच माझा मूळ हेतू आहे."
advertisement
advertisement
खरे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार - पोंक्षे
"स्वतः बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा संदर्भ घेतला होता, असं त्यांनी स्वतःच म्हटलंय. मी सध्या बाबासाहेबांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करत आहे आणि लवकरच 'खरे बाबासाहेब' लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी सर्व महापुरुषांचा नितांत आदर करणारा माणूस आहे," असा महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला.
advertisement
आपल्या भाषणांचे समर्थन करताना पोंक्षे म्हणाले की, त्यांचे जास्तीत जास्त कार्यक्रम हे बहुजन समाजातील लोकच आयोजित करतात. केवळ काही लोकांच्या चुकीच्या प्रतिक्रियेमुळे नाही, तर आपल्या चांगल्या मित्रांनी दिलेल्या सल्ल्यामुळे आपण हा माफीनामा जारी करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. "बोलण्याच्या ओघात कधीतरी चुकीचा शब्द निघून जातो, पण त्यामागे कोणाला दुखावण्याचा हेतू नसतो," असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 10:06 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
'फक्त वादाचा मुद्दा...' मनुस्मृती प्रकरणावरून गदारोळ, शरद पोंक्षेंनी जोडले हात; VIDEO शेअर करत म्हणाले...










