आता वेळ वाचणार, मुंबईला धाव घेण्याची गरज संपली, सीईटीच्या तक्रारी जिल्ह्यातच सुटणार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि अनावश्यक प्रवास वाचणार असून तक्रारींचे निवारणही स्थानिक पातळीवर अधिक वेगाने होणार आहे.
पुणे : आता सीईटीशी संबंधित तक्रारी, अर्ज प्रक्रियेतील गोंधळ किंवा दस्तऐवज पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना मुंबई गाठण्याची आवश्यकता राहणार नाही. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन राज्यभरात 40 जिल्हास्तरीय पूर्णवेळ कार्यरत, सुसज्ज मदत केंद्रे स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि अनावश्यक प्रवास वाचणार असून तक्रारींचे निवारणही स्थानिक पातळीवर अधिक वेगाने होणार आहे.
आजवर सीईटी परीक्षा, निकाल, प्रवेश प्रक्रिया किंवा पडताळणीदरम्यान उद्भवलेल्या तक्रारीसाठी विद्यार्थ्यांना थेट मुंबईतील सीईटी कक्षाशी संपर्क साधावा लागत होता. विशेषत: दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास त्रासदायक आणि खर्चिक ठरत होता. या अनुभवातून शिकत, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जिल्हास्तरावरच सर्वसमावेशक सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने उभारण्यात येणारी मदत केंद्रे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यापासून निकाल तपासणीपर्यंत आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देतील.
advertisement
या केंद्रांत सीईटीसंदर्भातील सर्व सेवा एकाच छताखाली मिळणार आहेत. अर्ज सादर करणे, परीक्षा प्रक्रियेतील शंका, दस्तऐवज पडताळणी, तक्रारींचे निवारण अशा सर्व बाबतीत तज्ज्ञ कर्मचारी तत्परतेने सहाय्य करतील. विशेष म्हणजे, आतापर्यंत करारावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या सीईटी कक्षाने आता कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीची जबाबदारी तंत्रशिक्षण संचालनालयाला देण्यात आली असून यामुळे विद्यार्थ्यांना अधिक उत्तरदायी सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
राज्य सरकारने याचबरोबर संगणकाधारित परीक्षा केंद्रांचीही मोठी उभारणी करण्याचे नियोजन आखले आहे. सध्या राज्यात केवळ सात हजार संगणकांच्या सहाय्याने परीक्षा घेतल्या जात असून त्यामुळे खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागतो. हा तुटवडा भरून काढण्यासाठी तब्बल 20 हजार नवे संगणकाधारित परीक्षा केंद्रे उभारण्याचे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक सुरळीत चालेल आणि परीक्षार्थींना अधिक सोयीस्कर वातावरण मिळेल.
advertisement
विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सीईटी परीक्षेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. अशा परिस्थितीत जिल्हास्तरीय मदत केंद्रांची सुविधा ही विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. आता कोणतीही शंका किंवा तक्रार असो, त्यांच्या तालुक्यातूनच तिचे निवारण होणार आहे. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह ठरत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 24, 2025 9:55 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
आता वेळ वाचणार, मुंबईला धाव घेण्याची गरज संपली, सीईटीच्या तक्रारी जिल्ह्यातच सुटणार


