35 फूट खोल जमिनीत आहे हे गणेश मंदिर, 12 वर्षांनी अवतरते गंगा
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असणारं पुरातन चिंतामणी मंदिर प्रसिद्ध आहे. येथे 12 वर्षांनी गंगा अवतरत असल्याचं सांगितलं जातं.
वर्धा, 20 सप्टेंबर: गणपती हे देशातील बहुसंख्य लोकांचं आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रात गणपतीची अष्टविनायक स्थानं प्रसिद्ध आहेत. तसेच विदर्भातही अष्टविनायकांचं अध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचे चिंतामणी मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पुरातन इतिहास असणाऱ्या या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. विशेष म्हणजे दक्षिणाभिमुख मूर्ती असलेलं भारतातील हे एकमेव गणपती मंदिर असल्याचं सांगण्यात येतं.
विदर्भाचे आराध्य दैवत म्हणून चिंतामणीची ओळख आहे. कळंबच्या श्री चिंतामणीचे मंदिर सामान्य भूतल पातळीपासून 35 फूट खोलात आहे. 29 पायऱ्या उतरल्यानंतर श्री चिंतामणीचे दर्शन घडते. याच कळंब नगरीत गृत्समद ऋषीने कापसाचा शोध लावल्याचा उल्लेख पौराणिक कथेत असल्याचंही सांगितलं जातं.
गणेशकुंड आख्यायिका
चिंतामणीच्या अगदी समोर कुंड आहे. याला 'श्री गणेशकुंड' असं म्हणतात. या गणेशकुंडातील पाण्यानेच इंद्रदेवाचा कुष्ठरोग बरा झाल्याची कथा सांगितली जाते. त्यामुळे या कुंडातील तीर्थाला भाविक खूप महत्व देतात. मंदिराच्या प्रवेश दारात उभे राहताच पुरातन 'चौमुखी गणेशमूर्ती' भाविकांचे लक्ष वेधून घेते.
advertisement
दर 12 वर्षांनी अवतरते गंगा
कळंबच्या मंदिराचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दर 12 वर्षांनी गंगा अवतरते. श्री चिंतामणीच्या पूजेसाठी देवराज इंद्राने पूर्वी गंगा आणली होती. तीच गंगा दर बारा वर्षांनी आजही प्रकट होते असे भाविक सांगतात. श्री मूर्ती चरणाला पाण्याचा स्पर्श झाला की गंगेचे पाणी आपोआप ओसरू लागते. ज्या श्री चिंतामणीच्या कृपेने देवराज इंद्राचे पाप धुतले गेले, त्या चिंतामणीला स्पर्श करून स्वतः पापमुक्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दर बारा वर्षांनी जेव्हा या ठिकाणी गंगा अवतरते त्यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भक्त हे सत्व बघण्यासाठी गर्दी करतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
First Published :
September 20, 2023 10:03 AM IST