IND vs AUS : विराटसोबत वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या खेळाडूंना ओळखलंत का? दोघंही भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी अंपायर
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
2008 साली टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा जगाने विराट कोहलीला पहिल्यांदा पाहिलं. विराटला वर्ल्ड कप जिंकवणारे दोन खेळाडू आता अंपायर झाले आहेत.
मुंबई : 2008 साली टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा जगाने विराट कोहलीला पहिल्यांदा पाहिलं. 17 वर्षांपूर्वी अंडर-19 वर्ल्ड कप जिंकलेल्या या टीममधले विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले महान खेळाडू झाले, पण उरलेल्या खेळाडूंचं करिअर फार यशस्वी राहिलं नाही. विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या वनडे सीरिजची तयारी करत आहे, तर विराटच्या अंडर-19 टीममधले दोन खेळाडू इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातल्या सामन्यात अंपायर म्हणून मैदानात उतरले.
भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी अंपायर
35 वर्षांचा तन्मय श्रीवास्तव आणि 37 वर्षांचा अजितेश अर्गल हे इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातल्या वनडे सीरिजमध्ये अंपायर होते. अजितेश अर्गल हा मीडियम फास्ट बॉलर अंडर-19 वर्ल्ड कपच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच होता. तर डावखुरा ओपनर तन्मय श्रीवास्तव याने अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये 262 रन केल्या होत्या.
advertisement
विराटच्या नेतृत्वात अंडर-19 वर्ल्ड कप खेळलेले तन्मय श्रीवास्तव आणि अजितेश अर्गल हे इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात कानपूरमध्ये झालेल्या 3 सामन्यांच्या सीरिजमध्ये अंपायर होते. तन्मय श्रीवास्तवने आयपीएलच्या मागच्या मोसमात अंपायर म्हणून काम केलं होतं, तसंच याआधी तो आरसीबीसोबत टॅलेंट स्काऊट म्हणूनही होता.
तन्मय-अजितेशने दिली परीक्षा
तन्मय आणि अजितेश यांनी 2023 मध्ये बीसीसीआयची अंपायरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली होती, यानंतर त्यांनी रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अंपायर म्हणून काम केलं. यानंतर त्यांना पहिल्यांदाच इंडिया ए च्या सामन्यात अंपायरची जबाबदारी मिळाली.
advertisement
अजितेश अर्गलला अंडर-19 वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमध्ये फार यश मिळालं नाही. अजितेश फक्त 10 प्रथम श्रेणी सामने खेळला. तर श्रीवास्तव जवळपास एक दशक उत्तर प्रदेशच्या टीमचा सदस्य होता. श्रीवास्तवने त्याच्या करिअरमध्ये 90 प्रथम श्रेणी सामने खेळले, पण तो कधीही टीम इंडियाच्या पदार्पणाच्या जवळ आला नाही.
मागच्या काही काळापासून भारतातल्या अंपायरची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. फक्त नितीन मेनन हेच आयसीसी एलिट अंपायरच्या लिस्टमध्ये आहेत. आता अजितेश आणि तन्मय श्रीवास्तव आयसीसीच्या एमिरेट्स पॅनल आणि त्यानंतर एलिट पॅनलमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 7:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : विराटसोबत वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या खेळाडूंना ओळखलंत का? दोघंही भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी अंपायर