तिसरी मुलगी झाली, पतीनं थेट प्रेयसीच घरी आणली, पत्नीनं अशी घडवली अद्दल
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Thane News: समाजात अजूनही मुलगा-मुलगी भेदभावाचे वास्तव समोर आले असून या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे: ‘वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा’ ही मानसिकता सध्याच्या काळात देखील काहींची आहे. याच हट्टामुळे भिवंडीतून संतापजनक प्रकार पुढे आला आहे. तिसरी मुलगी झाल्याने 35 वर्षीय विवाहितेला मुलींसह घराबाहेर हाकलून देण्यात आलंय. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पती, त्याची प्रेयसी तसेच सासरच्या इतर सदस्यांविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी परिसरातील भादवड परिसरात राहणाऱ्या पीडितेचा विवाह 20 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाश कांबळे याच्याशी झाला होता. विवाहानंतर तिला तीन मुली झाल्या. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून वारंवार तिला मुलगा हवा असल्याचे सांगत मानसिक दबाव टाकण्यात येत होता.
पीडितेच्या तक्रारीनुसार “आम्हाला मुलगा हवा आहे, त्यामुळे तू प्रकाशला त्याच्या प्रेयसीसोबत दुसरे लग्न करण्याची परवानगी दे” असे सांगत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता. या कारणावरून तिला वारंवार शिवीगाळ, मारहाण तसेच मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला आहे. पतीसह सासरच्या सदस्यांमुळे तिला शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागले.
advertisement
12 जानेवारी रोजी हा छळ टोकाला गेल्याचे सांगण्यात येते. त्या दिवशी पीडितेला तिच्या तिन्ही अल्पवयीन मुलींसह घरातून हाकलून देण्यात आले. घराबाहेर काढल्यानंतर पीडितेकडे कोणताही आधार नसल्याने तिला मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
सासरच्या जाचाला आणि अन्यायाला कंटाळून अखेर पीडितेने शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पती प्रकाश कांबळे, सासू विजयमाला कांबळे, नणंद कल्पना वाघमारे आणि प्रकाश याची प्रेयसी यांचा समावेश आहे. या घटनेमुळे समाजात अजूनही मुलगा-मुलगी भेदभावाचे वास्तव समोर आले असून या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 11:26 AM IST










