शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती करण्यासाठी झिरो बजेट नैसर्गिक शेती हा आजच्या काळातील अत्यंत महत्वाचा पर्याय ठरत आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि बाजारातील खर्चिक साधनांशिवाय शेती करण्याची ही पद्धत ‘झिरो बजेट’ म्हणून ओळखली जाते. प्रसिद्ध कृषी तज्ञ सुभाष पालेकर यांनी या संकल्पनेचा प्रसार केला आहे. या पद्धतीचा उद्देश एकच, शेतकरी कर्जमुक्त होऊन स्वतःच्या नैसर्गिक संसाधनांमधूनच शेती करावी आणि आत्मनिर्भर व्हावा. मातीची सुपीकता राखत नैसर्गिक परिसंस्था टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न अनेक राज्यांमध्ये यशस्वी होताना दिसत असल्याची माहिती बीड जिल्ह्यातील कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी दिली.



