असं गाव जिथे एकही फटाका न फोडता साजरी केली जाते दिवाळी, कारण आहे खूपच खास
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
या सणाच्या काळात विविध दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा धोका वाढतो, हे माहिती असूनही अनेक नागरिक फटाके फोडतात.
मुंबई, 13 नोव्हेंबर : सध्या दिवाळीचा सण सुरू आहे. या सणाच्या काळात विविध दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा धोका वाढतो, हे माहिती असूनही अनेक नागरिक फटाके फोडतात. मात्र, तामिळनाडूतील काही गावं अशी आहेत, ज्यांनी एकही फटाका न फोडता दिवाळी साजरी केली आहे. तमिळनाडूमधील इरोड जिल्ह्यापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'वडामुगम वेल्लोड' पक्षी अभयारण्यात जवळपासच्या सात गावांचा समावेश आहे. हे अभयारण्य, असंख्य पक्षी प्रजातींचं आश्रयस्थान आहे. त्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांच्या समुदायाने अभयारण्याजवळ कोणतेही फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वडामुगम वेल्लोड, सेल्लाप्पमपलायम, सेममंडमपालयम, करुक्कनकट्टू वलासू आणि पुंगमपाडी या गावांनी मूक दिवाळी पाळण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या गावांच्या आजूबाजूच्या 900 कुटुंबांनी एकत्रितपणे परिसरातील वन्यप्राण्यांना कोणताही त्रास न होता दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन दशकांहून अधिक काळापासून या गावकऱ्यांनी दिवाळीसाठी पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यांनी जवळपासच्या प्रदेशांना त्रास होऊ शकणारा आवाज किंवा व्यत्यय टाळून आपला आनंदोत्सव मर्यादित ठेवला आहे.
advertisement
हिवाळ्यात या अभयारण्यात हजारो पक्षी स्थलांतरित होतात. हे पाहुणे पक्षी आणि स्थानिक पक्ष्यांना प्रजननासाठी अभयारण्य वरदान ठरतं. या अभयारण्यात त्यांना त्यांची अंडी घालण्यासाठी आणि उबविण्यासाठी जागा मिळते.
नैसर्गिक अधिवासामुळे पक्ष्यांच्या प्रजननाला चालना मिळते आणि गावकऱ्यांनी कोणताही आवाज न करता दिवाळी साजरी केल्यानं पक्षी त्यांच्या वातावरणात बिनदिक्कतपणे वाढू शकतात. गावकरी आणि पक्षी शांततेत दिवाळी अनुभवतात. दिवाळीमुळे जवळच्या प्रदेशात कोणताही त्रास किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होत नाही.
advertisement
दरम्यान, दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. मात्र, नागरिकांनी ही बंदी पाळण्याला नकार दिल्याने दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये धुरके किंवा प्रदूषण असलेल्या धुक्याचं दाट आवरण पुन्हा बघायला मिळालं. बंदीच्या उल्लंघनामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये प्रचंड प्रदूषण झालं असून हवेची गुणवत्ता गंभीर झाली आहे.
सध्या दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक भागांमध्ये वाढत्या हवा प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवेतील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर आणि घरामध्ये अशा दोन्ही ठिकाणी अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. हवा प्रदूषण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचे विकार सुरू झाले आहेत. याशिवाय, मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्येही हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2023 4:47 PM IST