शेतरस्ता का आवश्यक असतो?
शेतीची मशागत, पेरणी, कापणी, सिंचन, खते-औषधं टाकणे तसेच शेतीमाल बाहेर नेण्यासाठी शेतीपर्यंत पोहोचणारा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेक वेळा शेतजमिनीला सार्वजनिक रस्ता किंवा मुख्य रस्त्याशी थेट जोडणारा रस्ता नसतो. अशा परिस्थितीत शेतकरी अडकतो, कारण त्याला त्याच्या मालकीच्या जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी शेजाऱ्यांच्या जमिनीतून मार्ग हवा असतो.
कायदेशीर तरतुदी काय आहेत?
advertisement
महाराष्ट्र भू-राजस्व संहिता 1966 च्या कलम 86 नुसार, कोणत्याही शेतकऱ्याला जर आपल्या जमिनीत जाण्यासाठी योग्य मार्ग उपलब्ध नसेल, तर त्याने तलाठी, मंडळ अधिकारी किंवा थेट तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून शेतरस्त्याची मागणी करता येते.
अर्जप्रक्रिया कशी आहे?
लिखित अर्ज तयार करा
अर्जात तुमचं पूर्ण नाव, पत्ता, सातबारा उताऱ्याची माहिती, संबंधित जमिनीचा गट क्रमांक आणि शेतात पोहोचण्यासाठी सध्या कोणता मार्ग आहे किंवा नाही, याबाबत स्पष्ट माहिती द्या.
रस्ता हवा असलेला मार्ग कोणाच्या शेतातून जावा लागेल, त्याचे गट क्रमांक व मालकाचे नाव याचा उल्लेख करावा.
संबंधित कागदपत्रे जोडा
सातबारा उतारा (7/12 extract)
जमीन नकाशा (गाव नकाशा किंवा फेरफार पत्र)
जर शेजारील मालक रस्ता देण्यास नकार देत असेल, तर त्याचा लिखित नकार किंवा माहिती
तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करा
तलाठी अर्ज स्वीकारतो आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल तयार करतो. हा अहवाल मंडळ अधिकाऱ्याद्वारे तपासला जातो.
तहसीलदार निर्णय देतात
तहसीलदार पातळीवर सुनावणी होते. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून, स्थळ पाहणी करून तहसीलदार स्वतंत्र शेतरस्ता मंजूर करू शकतो. मंजूर झाल्यानंतर रस्ता जमिनीवर मोजून नकाशावर दाखवला जातो आणि त्या बदलाची नोंद महसूल अभिलेखात होते.
शेतरस्त्याची ही मागणी म्हणजे कोणाच्याही हक्कावर गदा आणणे नव्हे, तर सार्वजनिक हितासाठी आणि शेतीच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेली सुविधा निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.