फोटो घेण्याची अट बदलली
गेल्या उन्हाळी हंगामात अॅपवर नोंदणी करताना शेतातील लागवड केलेल्या क्षेत्राचा फोटो 50 मीटरच्या आतून घेणे बंधनकारक होते. मात्र, आता ही अट बदलून 20 मीटर करण्यात आली आहे. यामुळे पीक नोंदणी अधिक अचूक होणार असून प्रत्यक्ष लागवडीचे स्पष्ट प्रतिबिंब नोंदवले जाईल, असे ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी सांगितले.
advertisement
ओटीपीची त्रासदायक प्रक्रिया संपली
पूर्वी नोंदणीदरम्यान मोबाईलवर आलेला ओटीपी वारंवार टाकावा लागत होता. आता केवळ एकदाच ओटीपी टाकून नोंदणी पूर्ण करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत होईल आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल.
नोंदणी झाल्यानंतर माहितीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. तसेच इंटरनेट नसले तरी नोंदणी अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नोंदणीची अंतिम मुदत
खरीप हंगामासाठी पिकांची नोंदणी प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली असून शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. कृषी विभागाने यंदा ई-पीक पाहणी नोंदणी पीक विम्यासाठी बंधनकारक केली आहे.
नोंदणीतील आढावा
आत्तापर्यंत 9 लाख 57 हजार 177 शेतकऱ्यांनी अॅपच्या माध्यमातून आपली माहिती भरली आहे. त्यात 9 लाख 2 हजार 830 हेक्टरवरील लागवडीची नोंद झाली आहे.
विभागनिहाय आकडेवारी
संभाजीनगर विभाग सर्वाधिक आघाडीवर असून येथे 2,73,435 शेतकऱ्यांनी 2,50,716 हेक्टरवरील पिकांची नोंदणी केली आहे.
अमरावती विभागात 1,43,260 शेतकऱ्यांनी 1,81, 855 हेक्टर क्षेत्र नोंदवले आहे.
नागपूर विभागात 1,89, 845 शेतकरी व 1,71,606 हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली आहे.
नाशिक विभागात 1,70,474 शेतकरी आणि 1,61,545 हेक्टरची नोंद झाली आहे.
पुणे विभागात 1,36,239 शेतकरी व 1,08,839 हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे.
कोकण विभागात तुलनेने कमी म्हणजे 44,414 शेतकऱ्यांनी 28,267 हेक्टरवरची नोंदणी केली आहे.
शेतकऱ्यांचा काय फायदा होणार?
या बदलांमुळे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी लागणारा वेळ व श्रम वाचतील. कमी अंतरावरून फोटो घेण्याची मुभा आणि एकदाच ओटीपी टाकण्याची सोय यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. याशिवाय, अचूक डेटा उपलब्ध झाल्याने पीक विम्याचा लाभ अधिक व्यवस्थितपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.