सचिन इंगवले हे पारंपरिक भात शेती करत होते. त्याचवेळी त्यांनी काही गाई पाळल्या होत्या. गाईंसोबत सुरुवातीला 2-3 गावरान कोंबड्याही होत्या. गाई आजारी पडू नयेत म्हणून गोठ्यात कोंबड्या ठेवण्याची पद्धत जुन्या काळापासून आहे. परंतु, हळूहळू लक्षात आलं की, या कोंबड्यांमधून गाईंपेक्षा जास्त नफा मिळत आहे. तेव्हा त्यांनी पूर्णवेळ गावरान कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळायचं ठरवलं. सुरूवात अवघ्या 6-7 कोंबड्यांपासून झाली होती.
advertisement
मार्केटमध्ये जबरदस्त मागणी! एक फळाला 100 रु भाव, लागवड करून 25 वर्ष करा बक्कळ कमाई
असं सुरू झालं कुक्कुटपालन
सचिन यांनी एलएसएस कोर्स पूर्ण केला होता. हे शिक्षण वाया जाऊ नये म्हणून त्यांनी पशुपालनात रस घेतला आणि त्याचा वापर व्यवसाय उभारणीसाठी केला. गावरान कोंबड्यांचा व्यवसाय करताना त्यांचा भर नैसर्गिक संगोपनावर असतो. ते कोंबड्यांना मोकळ्या जागेत फिरू देतात. त्यांच्या आहारात भाजीपाला, शेतीतील टाकाऊ साहित्य, माशांचं वेस्टेज, उरलेलं अन्न, तसेच ओढ्यांमधून मिळणाऱ्या शंख-शिंपल्यांची पावडर यांचा समावेश करतात.
कोंबड्यांना जे कॅल्शियम लागते ते शंख-शिंपल्यांच्या पावडरीतून मिळतं. माशांचं वेस्टेज आणि हॉटेलमधलं उरलेलं अन्न खाण्यामुळे त्यांचा पोषणमूल्यांचा समतोल राखला जातो आणि खर्चही कमी होतो, असं इंगवले सांगतात. कोरोना काळात लोक पुन्हा गावरान अंडी आणि कोंबडीचे मांस याकडे वळले. यामुळे बाजारात गावरान कोंबडीची मागणी झपाट्याने वाढली. हीच संधी पाहून इंगवले यांनी व्यवसाय अधिक प्रमाणात वाढवला.
कमी गुंतवणुकीत व्यवसाय
गावरान कोंबडी टिकवण्यासाठी योग्य वेळी लसीकरण, औषधोपचार, स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापन या गोष्टींचं ते काटेकोर पालन करतात. यामुळे आज त्यांच्या फार्मवर 2 हजार पेक्षा जास्त गावरान कोंबड्या आहेत. हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो. फक्त सुरुवातीच्या 6 महिन्यांमध्ये संयम ठेवावा लागतो. एकदा कोंबड्यांनी अंडी द्यायला सुरुवात केली की त्याच अंड्यांमधून पुढील कोंबड्या तयार होतात आणि व्यवसाय झपाट्याने वाढतो, असं सचिन इंगवले सांगतात.
हे गावरान कोंबडीपालनामुळेच शक्य
गावरान कोंबडी पालन व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून सचिन इंगवले यांनी हिंजवडी भागात एक इमारत बांधली आहे. तसेच स्वतःची जमीनही खरेदी केली आहे. हे सर्व गावरान कुक्कुटपालन व्यवसायाच्या यशामुळे शक्य झालं आहे, असं सचिन सांगतात.
शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज
आजच्या आधुनिक युगात पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय करणं हे काळाची गरज बनली आहे. अशावेळी सचिन इंगवले यांचा प्रवास तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक आहे. कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याची सखोल माहिती घ्या, योग्य प्रशिक्षण घ्या आणि मगच गुंतवणूक करा. योग्य नियोजन आणि सातत्य असेल तर कुठलाही व्यवसाय यशस्वी करता येतो, असा सल्ला इंगवले देतात.