पुणे: मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात अनेक शेतकरी कर्जाचा बोजा अन् नापिकीला कंटाळून आत्महत्या करतात. शेतकरी आत्महत्या म्हटलं की प्रत्येक जण हळहळतो. पण, पुढे कुणीच येत नाही. याला मूळचे परभणीचे असलेलं अशोक देशमाने अपवाद ठरले आहेत. शेतकरी आत्महत्येची स्थिती पाहिली अन् त्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून आयटी कंपनीतील नोकरी सोडून दिली. 2015 पासून ‘स्नेहवन’च्या माध्यमातून पत्नी अर्चना यांच्यासह ते 70 मुलांचं शिक्षण आणि संगोपनाचं काम करत आहेत. लोकल18 सोबत बोलताना अशोक देशमाने यांनी आपला प्रवास सांगितला आहे.
advertisement
मूळचे परभणीतील अशोक देशमाने यांनी 2015 मध्ये आयटी कंपनीतील नोकरी सोडून आळंदी जवळ स्नेहवन ही संस्था सुरू केली. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण आणि संनगोपनाच काम गेल्या 9 वर्षांपासून इथं सुरू आहे. देशमाने दाम्पत्याने गाव-खेड्यात मुलांच्या शिक्षणाचे होणारे हाल, त्या मुलांची हेंडसाळ थांबावी यासाठी बाबा आमटे आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून प्रेरित होऊन ही संस्था सुरु केली. आता देशमाने दाम्पत्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पूर्णवेळ काम करत आहेत.
महाराष्ट्रातील एकमेव व्यावसायिक! गोल्डन गवतापासून बनवतात वस्तू, कोल्हापुरात खरेदीसाठी गर्दी
70 मुलांची जबाबदारी
सध्या जवळपास 70 ते 80 मुलं इथं शिकत आहे. पूर्वी 10 बाय 10 च्या रूम मध्ये हा प्रकल्प राबवला जात होता. आमचं हे काम पाहून डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कुलकर्णी या दाम्पत्याने आळंदी जवळची 2 एकर जागा दान केली आहे. या मुलांनाही चांगल शिक्षण देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. 2 खोल्यांमध्ये 18 मुलांना घेऊन लावलेले हे स्नेहवनचे रोपटे आज अनेक मुलांना मायेची सावली देत आहे. स्नेहवन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांची, तसेच आई किंवा वडील नसलेल्या मुलामुलींच्या शिक्षण, संगोपन व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी घेते.
सुरुवातीला केवळ पत्र्याच्या छपराची बैठी इमारत असलेल्या संस्थेच्या आवारात आता तीन नवीन इमारती उभारल्या आहेत. शिवाय ग्रंथालय, प्रयोगशाळा, गोशाळा इथे आहेत. या मुलांबरोबरच आता वंचित मुलींचं शिक्षण आणि संगोपनाची व्यवस्था संस्थेत केली आहे. मुलांनी शिक्षण घेऊन उद्योजक बनावे, इतरांसाठी रोजगार निर्माण करावा यासाठी इथं शिक्षण व प्रोत्साहन दिलं जातं, असं देशमाने सांगतात.
मुलांना विशेष प्रशिक्षण
मुलांच्या मनावर बालपणापासून उद्योगाचे धडे बिंबवण्यासाठी शेतीशी निगडित तसेच इतर उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मुलांना दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांना कनक मशीन, प्लम्बिंग, इलेक्ट्रिक, वेल्डिंगपासून भरतकामा पर्यंत सर्व शिकवले जाते. यासोबतच ग्लोबल क्लासरूम, मोफत फिरता दवाखाना, कामधेनू गोशाळा, वाचनालय, प्रयोगशाळा, ज्ञानछत्र, साखर शाळा, नवचेतना असे 'स्नेहवन'चे अन्य प्रकल्प देखील राबवले जातात, अशी माहिती अशोक व त्यांच्या पत्नी अर्चना यांनी दिली आहे.