छत्रपती संभाजीनगर: प्रत्येक मुलाला सक्तीनं प्राथमिक शिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तरीही काही मुलं कौटुंबिक स्थिती आणि इतर कारणांनी शिक्षणापासून वंचित राहतात. अशाच वंचित मुलांना शिकवण्याचं काम एक भगवान करत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे भगवान सदावर्ते हा तरुण विना छताची शाळाच चालवतोय. अनेक संकटांवर मात करत त्यानं आपला उपक्रम अखंड सुरू ठेवला असून त्यांच्या कामाचं कौतुक होतंय.
advertisement
भवान सदावर्ते हा मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील चिंचोलीचा आहे. शिक्षणासाठी तो छत्रपती संभाजीनगर येथे आला. शहरातील देवगिरी महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. याच काळात एमपी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असून आता तिसऱ्या वर्षात शिकत आहे. कोरोना काळापासून त्यानं वंचित मुलांना शिकवण्यासाठी बिन छताची शाळा सुरू केली.
अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन; सई परांजपेंना जीवनगौरव पुरस्कार
कशी झाली सुरुवात?
भगवान यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळात काही लहान मुलं ड्रग्स घेत असल्याचं पाहिलं. ही मुलं शिक्षणापासून वंचित असल्यानं चुकीच्या मार्गाला जात असल्याची जाणीव झाली आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा भगवाननं निर्णय घेतला. त्यासाठी मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. परंतु, त्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला. मुलांच्या पालकांना माझी भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी काहीही न ऐकता शिवीगाळ देखील केली. तरीही मी माझा निर्णय बदलला नाही. त्यांना समजावून शिकवण्याचा निर्धार कायम ठेवल्याचं भगवान यांनी सांगितलं.
भगवान मुलांच्या घरी गेले त्यांच्यासोबत जेवण केलं. त्यांच्या आई-वडिलांसोबत जेवण केलं. त्यांच्याशी चांगल्या गप्पा मारल्या. त्यानंतर हळूहळू त्यांच्या आई-वडिलांना विश्वास बसायला लागला. त्यामुळे त्यांच्या वसतीमध्ये जाऊन एका लिंबाच्या झाडाखाली शाळा घ्यायला सुरुवात केली. त्या ठिकाणी एक पाटी लावली त्यावर विना छताची शाळा असं लिहिलं. इथूनच या शाळेला सुरुवात झाल्याचं भगवान सदावर्ते सांगतात.
प्रेमासाठी कायपण! आंतरजातीय विवाहासाठी कुटुंबीयांची ‘ती’ अट, इंजिनिअर जोडप्यानं करून दाखवलं!
वंचित मुलांना शिक्षण
छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंप जवळ असणाऱ्या भाग्यनगर या ठिकाणी एक छोटीशी वसती आहे. त्या ठिकाणी जाऊन ते मुलांना शिकवतात. त्याचबरोबर शहरातीलच वाळूज परिसरामध्ये जाऊन देखील ते मुलांना शिक्षण देतात. तसेच हनुमान टेकडी परिसरामध्ये अनेक वीटभट्टी आहेत. त्या ठिकाणी जाऊन देखील मजुरांच्या मुलांना शिकवण्याचं काम करतात.
वाळूज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात एमआयडीसी परिसर आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. दररोज संध्याकाळी इथं विना छताची शाळा भरते. अनेक मुलांना सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेऊन दिला. तसेच या मुलांना आवश्यक इतर मदत देखील ते करतात. त्यांचे हे काम समाजहिताचे असून आपल्या कृतीतून भगवान यांनी अनेकांपुढे अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे.