असाच प्रसंग एका तरुणासोबत घडला, साध्या ढाब्यावर काम करणाऱ्या आणि महिन्याला 10 हजार कमावणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात 46 कोटी 18 लाख रुपये आले. आता हे ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल आणि उत्सुकताही लागेल की नक्की असं काय घडलं? चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.
ग्वाल्हेरमधील एका ढाब्यावर 10 हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या कुकच्या खात्यातून तब्बल 46 कोटी 18 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं उघड झालं. तेव्हा एवढा मोठा पैसा त्याच्याकडे आला कसा आणि गेला कुठे? असा प्रश्न इनकम टॅक्स विभागाला पडला, त्यावेळी त्यांनी या व्यक्तीच्या घरी नोटीस पाठवली. पण या व्यक्तीचं म्हणणं आहे की त्याला या व्यवहाराबद्दल काहीच माहिती नाही.
advertisement
ढाब्यावर काम करणारा रवींद्र अचानक संकटात
ही कहाणी भिंड जिल्ह्यातील रहिवासी रवींद्रसिंग चौहान यांची आहे. सध्या तो ग्वाल्हेरमधील एका ढाब्यावर कुक म्हणून काम करतो. रवींद्र सांगतो की, वर्ष 2017 मध्ये तो मेहरा टोल प्लाझावर काम करत होता. तिथेच त्याची ओळख शशी भूषण राय नावाच्या सुपरवायझरशी झाली. 2019 मध्ये हाच सुपरवायझर त्याला दिल्लीला घेऊन गेला. तिथे रवींद्रचं एका बँकेत खाते उघडण्यात आलं. त्याला सांगितलं गेलं की, त्याच्या पीएफची रक्कम या खात्यात जमा होईल. रवींद्रने तेव्हा फारसं लक्ष दिलं नाही आणि पुन्हा ग्वाल्हेरला परतला.
दरम्यान रवींद्र पुण्यात काम करू लागला. पण यंदाच्या एप्रिल महिन्यात इनकम टॅक्स विभागाची नोटीस त्याच्या भिंडमधील घरी पोहोचली. इंग्रजी येत नसल्यानं घरच्यांना ती समजली नाही. जुलैमध्ये पुन्हा दुसरी नोटीस आल्यावर मात्र त्यांनी रवींद्रला घरच्यांनी फोन करून सांगितलं. त्याला शंका आली की प्रकरण गंभीर आहे, म्हणून त्याने पुण्यातील नोकरी सोडली आणि थेट भिंडमध्ये गेला. तिथून वकिल प्रद्यु्म्नसिंग यांच्याकडे पोहोचला.
वकिलांनी कागद तपासून पाहिला आणि थेट सांगितलं की, "हे इनकम टॅक्स विभागाचं नोटीस आहे. तुझ्या खात्यातून 46 कोटी 18 लाख रुपयांचा व्यवहार झालाय." हे ऐकताच रवींद्रच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र पोलिसांनी कोणतीही एफआयआर नोंदवली नाही. त्यांचं म्हणणं होतं की, खाते दिल्लीमध्ये उघडलं गेलं आहे, त्यामुळे तिथे त्याला जावं लागेल.
सर्वत्र धावपळ करूनही काही उपाय न झाल्याने रवींद्रने अखेर हायकोर्टाची दारं ठोठावली. वकिलांचा दावा आहे की, इनकम टॅक्स विभागानं सगळी चौकशी करूनच नोटीस पाठवली आहे. आता या गोंधळामागचं खरं सत्य काय आहे, हे न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.