बीड : गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचा माजी उपसरपंच आणि ठेकेदार गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली. प्रेयसी नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंग आणि खोट्या गुन्ह्याच्या धमकीला कंटाळून गोविंद बर्गे यांनी 9 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गोविंद यांची आत्महत्या आहे की हत्या आहे, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. नर्तकी प्रेयसी पूजा गायकवाडला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. तर, दुसरीकडे एका व्हिडीओ कॉलमुळे गोविंद यांचा जीव वाचला असता का, याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करत होते. या व्यवसात त्यांचा हळूहळू चांगला जम बसायला लागला होता. त्याच दरम्यान त्यांची ओळख पारगाव कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड सोबत झाली होती. त्यानंतर ही ओळख जवळीकमध्ये वाढत गेली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, प्रेमात पूजाने गोविंदकडून पैशांची मागणी सुरू केली होती. त्यानुसार गोविंदने वेळोवेळी पूजाला व तिच्या नातेवाइकांना पैसे, सोन्याचे दागिने दिले. एवढेच नव्हे, तर तिच्या भावासाठी महागडा मोबाईल व बुलेट मोटारसायकल खरेदी केली. तिच्या आईसाठी सासरच्या गावी घर बांधून दिले, तर मावशीसाठी वैराग येथे प्लॉट घेतला. याशिवाय नातेवाइकांच्या नावावर तीन एकर शेतीही विकत घेतली होती. मात्र, या सर्व गोष्टी असूनही पूजाच्या अपेक्षा वाढतच गेल्या. सततच्या दबावामुळे आणि वाढत्या तणावाखाली अखेर बर्गे यांनी आत्महत्येचे टोक गाठले.
गोविंदने पूजाला स्वतःचे कला केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे 8 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली. त्याशिवाय, तिचे सर्व हट्ट तो पूर्ण करत होते. मात्र तिच्या मागण्या सतत वाढत होत्या. पूजाला वाढदिवसाच्या आधी गेवराईतील घर देखील तिच्या नावावरती करून हवं होतं, अशी माहितीदेखील समोर आली. गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली नसून त्यामागे घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरू केला आहे.
तर वाचले असते गोविंदचे प्राण?
पूजाकडून होत असलेली वारंवार मागणी, ब्लॅकमेलिंग आणि धमकी यामुळे गोविंद बर्गे हे तणावाखाली होते. पूजासोबत बोलून यातून मार्ग काढण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू होता. पैशांच्या मागण्यांमुळे आणि सततच्या मानसिक त्रासामुळे हैराण झालेल्या गोविंदने 8 सप्टेंबरला अंतिम प्रयत्न म्हणून पूजाशी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूजाने थेट नकार दिला. त्यानंतर संतप्त गोविंदने पूजाच्या आईच्या घरासमोर जाऊन व्हिडीओ कॉलवर आत्महत्या करण्याचा इशारा दिला. पण समोरून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्याची निराशा अधिकच वाढली. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 सप्टेंबरच्या सकाळी, साडेनऊच्या सुमारास गोविंदने काळ्या रंगाच्या कारमध्ये बसून टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर आली आहे. पूजाने गोविंद यांच्याशी बोलणं केलं असतं तर कदाचित त्यांनी टोकाचे पाऊल उचलले नसते अशी चर्चाही सुरू आहे.