विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. जळगाव जिल्ह्यातील विदगावजवळील तापी नदीच्या पुलावर मंगळवारी उशिरा रात्री घडलेल्या भीषण अपघातात कारमधील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला तर बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे शिक्षक दामप्त्य असलेले चौधरी कुटुंब उद्धवस्त झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच तातडीने स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मृतांमध्ये मीनाक्षी चौधरी आणि त्यांचा 12 वर्षीय मुलगा पार्थ चौधरी यांचा समावेश आहे. तर पती निलेश चौधरी आणि 4 वर्षीय मुलगा ध्रुव चौधरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरी दांपत्य शिक्षक असून जळगाव शहरात वास्तव्यास आहेत. ते आपल्या मुलांसह देवदर्शनासाठी चोपडा येथे गेले होते. दर्शन आटोपून घरी परतत असताना तापी नदीच्या पुलावर वाळू भरलेल्या डंपरने कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार थेट नदीपात्रात कोसळली.
अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच मीनाक्षी व त्यांचा मुलगा पार्थ यांचा मृत्यू झाला. निलेश व ध्रुव यांना स्थानिकांनी मदतीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर धडक दिलेला डंपरही पुलावर पलटी झाला होता. या घटनेनंतर मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. आप्तेष्टांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आणि रडारड ऐकून वातावरण शोकमग्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.