गोविंदासोबत काम करण्यास नकार देणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून माधुरी दीक्षित होती.90 चं दशक म्हणजे माधुरी दीक्षितचा काळ. तिच्या हास्याने, नृत्याने आणि अभिनयाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली. पण या टॉप हिरोईनने एकदा नवोदित गोविंदासोबत चित्रपट करण्यास सरळ नकार दिला होता. आणि हा नकार तिच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा वळण ठरला, तर दुसऱ्या अभिनेत्री नीलमसाठी तो सोन्याची संधी ठरली.
advertisement
हा धक्कादायक खुलासा नुकताच दिग्दर्शक आणि निर्माते पहलाज निहलानी यांनी केला. त्यांनी सांगितले की, “गोविंदाच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात मी त्याला माधुरीसोबत कास्ट करायचं ठरवलं होतं. पण माधुरीच्या मॅनेजर रिक्कू (राकेश नाथ) ने तिच्याकडून नकार सांगितला. त्यामुळे मला शेवटी नीलम कोठारीला घ्यावं लागलं. हा मोठा धोका होता, पण त्याचा परिणाम चमत्कारिक ठरला. कारण ‘इल्जाम’ हिट झाला आणि नीलम एका रात्रीत स्टार बनली.”
निहलानींच्या म्हणण्यानुसार, रिक्कू आणि काही निर्मात्यांनी गोविंदाविरुद्ध गट तयार करून त्याची कारकीर्द रोखण्याचा प्रयत्न केला. “8-10 निर्मात्यांनी पटकथेत पाने जोडली, पण त्या चित्रपटांचा काही उपयोग झाला नाही. गोविंदाच्या विरोधात कट रचला जात होता,” असं ते म्हणाले.
पहलाज निहलानी पुढे सांगतात, “माधुरी मला वारंवार नकार देत होती. मी ऑफर केलेले चित्रपट ती करत नव्हती. शेवटी मी सलग तीन चित्रपट नीलमसोबत केले. ‘इल्जाम’, ‘आग ही आग’ आणि ‘पाप की दुनिया’. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुवर्ण महोत्सवी ठरले. त्या काळात माधुरीचे चित्रपट मात्र फ्लॉप होत होते.”
पण पुढे नशिबाने माधुरीला एका चित्रपटाने नवे आयुष्य दिले. निहलानी सांगतात, “रिक्कूने मला माधुरीसाठी एक चित्रपट करण्याची विनंती केली. तो चित्रपट होता ‘तेजाब’. अनिल कपूरसोबत तिचं गाजलेलं गाणं ‘एक दोन तीन’ लोकांच्या डोक्यावर बसलं आणि माधुरी रातोरात सुपरस्टार झाली. तिला फिल्मफेअर नामांकनही मिळालं.” यानंतरच माधुरीने गोविंदासोबतही अनेक चित्रपट केले, ‘महासंग्राम’, ‘इज्जतदार’, ‘पाप का अंत’. पण सुरुवातीला जर तिने गोविंदासोबत काम केलं असतं, तर कदाचित तिच्या कारकिर्दीचा प्रवास वेगळाच झाला असता.