शनिवारी (८ नोव्हेंबर) अकोल्यात शरद पवार गटाचा 'शेतकरी संवाद' कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला स्वत: शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या, काहींनी निवेदने दिली. मात्र, या निवेदनांमध्ये एका तरुणाचे पत्र पाहून शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही क्षणभर विचार करायला लावले.
"मला जीवनदान द्या, तुमचे उपकार विसरणार नाही!"
advertisement
आपलं वय वाढत आहे, भविष्यात लग्न होणार नाही आणि आपण एकटेच राहू, या भीतीने त्रस्त झालेल्या अकोल्यातील तरुणाने पत्रात स्वतःचा पत्ता आणि मोबाइल नंबर दिला आहे. तो अत्यंत नम्रपणे पवारांना विनंती करतो, "माझे वय वाढतेय, भविष्यात माझे लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी."
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, असं तरुणाने पत्रात म्हटलं आहे. इतकेच नाही तर, "मी तिच्या घरी राहायलाही तयार आहे. तिथे चांगलं काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी देतो," असे त्याने पत्रात म्हटले आहे. या तरुणाने पत्राचा शेवट, "मला जीवनदान द्यावं, मी तुमचे उपकार विसरणार नाही," असं म्हटलं आहे. त्याच्या या पत्राबाबत शरद पवारांनी स्वत: जयंत पाटील यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
