संगमनेर, अहिल्यानगर: हिंदुत्ववादी कीतर्नकार संग्रामबापू भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. थोरात यांना दिलेल्या धमकीच्याविरोधात आज संगमनेरमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाषण करताना बाळासाहेब थोरात यांनी व्हिडीओ फूटेज दाखून संग्रामबापू भंडारे यांनी केलेला मारहाणीचा दावा खोटा असल्याचे म्हटले.
advertisement
काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित केलेल्या मोर्चात संगमनेरकरांनी चांगलीच गर्दी केली होती. या वेळी आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि कीर्तनकार भंडारे यांच्यावर टीकास्त्र सोडले. तालुक्यातील खोट्या केसेस करण्याचं काम थांबवलं पाहिजे. पोलिस घरगडी असल्यासारखं वागतात, गुंड लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
थोरांताचे लाव रे व्हिडीओ...
बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, मागील काही महिन्यांपासून संगमनेरमधील वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ह्याला महाराज म्हणणार नाही, भंडारे हा कसा नाटक करतोय, कसं दुसऱ्याचं हत्यार बनलाय हे व्हिडीओतून सगळ्या तालुक्याला, महाराष्ट्रातला दिसेल. तालुक्याचं नाही तर महाराष्ट्रातही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे थोरात यांनी म्हटले.
थोरातांचे लावरे व्हिडीओ, हल्ला झाल्याचा भंडारेंचा आरोप खोटा?
बाळासाहेब थोरात यांनी आजच्या मोर्चातील सभेत काही सीसीटीव्ही फुटेज दाखवत कीर्तनकार भंडारे यांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना नाहक खोट्या केसेसमध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे थोरातांनी सांगितले.
सभेतील स्क्रीनमध्ये सीसीटीव्ही फूटेज दाखवण्यात आले. कीतर्नकार भंडारे यांची कार संगमनेरमध्ये आली त्याच वेळी ती फुटलेली होती, असा दावा सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे करण्यात आला. संगमनेरमध्ये प्रवेश करतानाचे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फूटेज दाखवण्यात आले. त्यानंतर वाद झालेल्या घुलेवाडीत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कारमधून भंडारे घुलेवाडीत आले. भंडारे आले एका गाडीतून पण दुसऱ्या कारमधून ते माघारी गेले असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. 16 ऑगस्ट रोजी झालेल्या कीर्तनाच्या वेळी भंडारे आणि त्यांच्या काही समर्थकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचे व्हिडीओतून दावा करण्यात आला.
कीर्तनाच्या वेळी गोंधळ सुरू झाल्यानंतर भंडारे हे मागील वाटेने बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत काहीजण होते. यावेळी त्यांनी कोणीही धक्काबुक्की केली नसल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे थोरात यांनी म्हटले.
गुंडांच्या प्रतिकारासाठी अमृतसेना तयार करणार...
बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, संगमनेरमधील परिस्थिती चिघळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गावोगावी गुंड आणले जात आहेत. या सगळ्यांच्या प्रत्युत्तरासाठी अमृतसेना तयार करणार असल्याचे थोरात यांनी जाहीर केले. शहरातील मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरीकडे होत आहे आपल्याला काय असं न म्हणता तुम्ही विचार केला पाहिजे. ज्यावेळी तुमच्याकडे हे लोक वळतील तेव्हा तुमच्यासाठी कोणीच नसेल, असा इशारा थोरात यांनी दिला.