एक सुनावणी गृह राज्यमंत्र्यांनी घेतली होती. पण शस्त्र परवाना दिलाच गेला नाही.पोलीस आयुक्तांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.त्यामुळे परवाना दिला गेला नाही. परवाना दिला असता तर अशाच प्रकारचा आरोप योग्य होता, पण परवाना दिला गेला नाही,त्यामुळे योगेश कदम यांना दोषी ठरवता येणार नाही,असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिनचीट दिली होती.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या क्लिनचीटनंतर आता योगेश कदम यांनी ट्वीट करून विरोधकांचा समाचार घेतला आहे.
२०१९ पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते.
पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खाजगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला.
तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच, ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसं बघवणार!
गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत.
दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काहीजणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती.
असो, राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसंच निभावत राहणार आहे.
शेवटी असंच म्हणावं वाटतं की,“छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही,असे म्हणत योगेश कदम यांनी विरोधकांना सुनावलं आहे.