अजित पवारांची कारकीर्द
महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक नेतृत्व, स्पष्ट भूमिका आणि निर्णायक निर्णयांसाठी ओळखले जाणारे नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेतले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाचा चेहरा असलेल्या अजित पवारांची राजकीय कारकीर्द ही संघर्ष, सत्ता, बंडखोरी आणि पुनरागमन अशा अनेक टप्प्यांतून गेलेली आहे.
२२ जुलै १९५९ रोजी बारामतीत जन्म
advertisement
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आहेत. मात्र, केवळ पवार कुटुंबातील सदस्य म्हणून नव्हे, तर स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करणारे नेते म्हणून अजित पवार ओळखले जातात. त्यांनी १९९१ साली बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. तेव्हापासून बारामती हा त्यांचा अभेद्य बालेकिल्ला ठरला आहे होता.
अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. विशेषतः अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द लक्षवेधी राहिली. सलग अनेक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सिंचन, जलसंपदा, अर्थ आणि नियोजन यांसारख्या खात्यांमध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेतले. काही निर्णयांवरून ते वादातही सापडले, मात्र प्रशासकीय पकड असलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहिली.
सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री
२०१० ते २०१४ या काळात ते उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली. मात्र काही दिवसांतच हा प्रयोग फसला आणि अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. हा काळ त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात नाट्यमय टप्पा मानला जातो.
यानंतर २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा वेगळा निर्णय घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळा गट स्थापन केला आणि भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाले. या वेळी ते पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. अजित पवार हे महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील अत्यंत प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जात होते.
