धाराशिव : अनेकांचा ओढा आजही हा सरकारी नोकरीकडे दिसून येतो. मात्र, काही जण हे नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करतात आणि त्यातूनही चांगले करिअर करुन दाखवतात. आज अशाच एका व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील धर्मराज पंडितराव जाधव यांची ही कहाणी आहे. पदवीचे शिक्षण चालू असतानाच त्यांच्या आईचे अपघाती निधन झाले. त्यानंतर अवघ्या एक वर्षात वडिलांचेही अकाली निधन झाले. अशा परिस्थितीत मग शिक्षण सोडून नोकरीच्या पाठीमागे न लागता जाधव यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले.
advertisement
54 एकर बांबूची शेती, कोट्यवधींची उलाढाल, एकेकाळी कर्जबाजारी असलेल्या व्यक्तीची प्रेरणादायी गोष्ट!
स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा, अशी जिद्द मनात होती. परंतु, आर्थिक पाठबळ असल्याने त्यांनी भावाशी चर्चा केली. भावाने एक लाख रुपयांची मदत केली आणि मदतीतून इलेक्ट्रिकल दुकानाची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर 3 वर्षे इलेक्ट्रिकल दुकानाचा व्यवसाय चालवला. परंतु व्यवसायात म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. मग त्यांनी मंगल कार्यालय उभारण्याचं ठरवले.
वडिलोपार्जित शेती होती. परंतु मंगल कार्यालय उभारण्यासाठी पैसे नव्हते. मागील तीन वर्षात व्यवसायातून जमवलेले भांडवल आणि बँकेची मदत घेऊन त्यांनी मंगल कार्यालय सुरू केले. पण कोरोना काळात मंगल कार्यालयाचे हप्ते भरणे देखील अवघड झाले होते. त्यानंतर हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर आला. यानंतर त्यांनी श्री साई लँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून रो हाऊसची निर्मिती चालू केली. उत्तम गुणवत्ता असल्यामुळे रो हाऊसला चांगला प्रतिसाद मिळाला आणि जाधव यांचे दिवस पालटले. आता त्यांची महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होते आहे.
आतापर्यंतच्या प्रवासात त्यांना अनेक अडचण आल्या. एकीकडे कुटुंब सांभाळायचं होते तर दुसरीकडे भविष्याची तरतूद करायची होती. डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र हरवले होते. तसेच सुरू केलेल्या इलेक्ट्रिक व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळत नव्हते. मात्र, जिद्दीच्या बळावर त्यांनी अडचणींवर मात केली आणि त्यांनी विविध व्यवसाय उभे केले. त्यांचा हा प्रवास तरुणाईसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.