धाराशिव : 'झाडे लावा, झाडे जगवा' हे आपण शाळेत शिकलो. तेव्हा कुतूहलानं वृक्षलागवड करायचो, त्या रोपांना जपायचो. परंतु हळूहळू ती सवय सुटली आणि मोठेपणी अचानक झाडांचं महत्त्व कळलं. आपण निसर्गाचं देणं लागतो हे आपल्याला अचूक माहितीये मात्र तरीही एकतरी रोप लावावं, याचं पालन फार कमीजण करतात.
धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा शहरातील 7 तरुणांनी वृक्षलागवडीचा संकल्प केला होता. त्यातून तयार झाला 'निसर्गप्रेमी ग्रुप'. हळूहळू सदस्यसंख्या वाढत गेली आणि वृक्षलागवडीच्या कामाला वेग आला. आज या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो निसर्गप्रेमी आवडीनं रोप लावतात.
advertisement
हेही वाचा : ना पार्टी, ना पिकनिक; तरुणीनं निसर्गात साजरा केला बर्थडे, लावली हजार झाडं!
उमरगा शहरातील रस्त्यांवरचे दुभाजक, मोकळी जागा आणि ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण केलं जातं. निसर्गप्रेमींनी आतापर्यंत 300 रोपांची लागवड केली असून 5000 वृक्षारोपणाची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रुपचे सदस्य सचिन माशाळकर, महेश कवठे, रवीकिरण अंकलकोटे, संदीप पांचाळ, राहुल शिंदे, राहुल पोद्दार, डॉ. लक्ष्मण सातपुते, इत्यादी निसर्गप्रेमी सदस्य स्वखर्चातून वृक्षारोपण करतात.
विशेष म्हणजे या ग्रुपकडून केवळ रोपांची लागवड केली जात नाही, तर त्यांची काळजीही घेतली जाते. वृक्षलागवडीसाठी जिथं काळ्या मातीचा अभाव आहे तिथं माती टाकली जाते, जनावरांपासून संरक्षण व्हावं यासाठी झाडांना संरक्षणात्मक जाळी लावली जाते. आपण लावलेली झाडं जगलीच पाहिजे यासाठी परिश्रम घेतले जातात. वड, कडूलिंब ,आंबा, पिंपळ, इत्यादी झाडांची लागवड या ग्रुपकडून करण्यात येते. हे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे भविष्यात निसर्गप्रेमी ग्रुप हजार वृक्षांची लागवड करणार असल्याचं रवीकिरण अंकलकोटे यांनी सांगितलं.