ओबीसी नेते लक्ष्मण हाके, इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संजय सोनवणी यांनी वाघ्या श्वानाचे पुरावे असल्याचा दावा केला. वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याचा अल्टिमेटम सरकाराला 31 तारखेपर्यंत मुद्दामच देण्यात आल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला.
advertisement
इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी म्हटले की, रायगड हा पुरातत्व खात्याचा ताब्यात आहे. त्यांच्या आदेशाशिवाय या ठिकाणचा दगड देखील हलवता येत नाही. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पण, मुळात मुख्यमंत्र्यांना याचा अधिकार आहे का हे पाहावं असा टोलाही त्यांनी लगावला. संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पत्रात वाघ्या श्वानाचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा केला होता. मात्र, त्याचे इतिहासात पुरावे असल्याचे सोनवणी यांनी सांगितले.
वाघ्या कुत्र्याचा पुरावा काय?
संजय सोनवणी यांनी सांगितले की, अनेक ऐतिहासिक शिल्पात छत्रपती शिवरायांसोबत हा वाघ्या दिसत आहे. शिवाजी महाराजांसोबत हा श्वान नेहमी सोबत राहत होता म्हणून याचा उल्लेख आढळून येतो. जर्मन लोकांनी देखील दुसरा पुरावा याबाबत जपून ठेवला आहे. 1845 मध्ये अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. त्यातील एका ग्रंथातील उल्लेख सोनवणी यांनी सांगितला, "1680 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांच्या समाधी बांधण्यात आली आणि तिथं वाघ्या कुत्रा महाराजांच्या समाधीकडे पाहत आहे असा उल्लेख या पुस्तकात असल्याचा दावा संजय सोनवणी यांनी केला.
वाघ्या हा स्वामीनिष्ठ होता, ईमानदार होता. इंग्रजांनी रायगड किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळेस अनेक वास्तू नष्ट झाल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. वाघ्याचा आताच पुतळा जो आहे त्याला होळकर यांनी निधी दिला होता. वाघ्या ऐतिहासिक नव्हता हा दावा खोटा असल्याचेही सोनवणी यांनी सांगितले.
छत्रपतींच्या वंशांनी वाद काढावा हे दुर्दैव...
सोनवणी यांनी सांगितले की, पुतळाबाईची समाधी नाही त्या सती गेल्या. सोयराबाईंची हत्या झाली होती, त्यामुळे त्यांची देखील समाधी असू शकत नाही. सईबाईंची समाधी राजगडावर असल्याचे त्यांनी म्हटले.
काही पुरावे लिखित तर काही वास्तूच्या स्वरूपात मिळत असतात. पावनखिंडचे युद्ध तिथे झालं का नाही झालं हा अजूनही प्रश्न आहे. वाद हा ऐतिहासिक असतो. केवळ वाद निर्माण केला जात आहे हे दुर्दैव असल्याचे मत सोनवणी यांनी व्यक्त केले. औरंगजेब जगाच्या पाठीवर कुठेही मेला असता तरी त्याचे समाधी खुलताबादला झाली असती कारण त्याची शेवटची इच्छा होती. हा वाद उकरून काढला जात आहे आणि हा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा हे दुर्दैव असल्याचे मतही संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.
छत्रपतींच्या सैन्यात श्वानांचेदेखील पथक होते. त्याचे देखील पुरावे आहेत. गनिमी काव्याने कुत्र्याची झुंड आधी छत्रपती शत्रू पक्षातील सैन्यांवर सोडायचे. आता कुत्रा अपमानास्पद का वाटत आहे, असा सवाल त्यांनी केला.